पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुझी
आई.
 जनकच्या आठवणीनं अनूला अगदी आतून भरून आलं. वाटलं टेलिफोनच्या ध्वनिलहरीतून थेट जळगावमध्ये पोचावं. अगदी वाड्यात आणि जनकला गच्च मिठीत घ्याव… त्याच्या गुबऱ्या गालांचे खूपखूप पापे घ्यावेत. एवढ्यात श्री दार ढकलून आत आला. भूक लागलीय. झटपट पिठलं नि भाकरी कर. पोटात भुकेचा डोंब उसळलाय. अने दुसरी भूक पण लागलीय. अगदी सपाटून… तेव्हा" अनूच्या केसांचा लांबसडक शेपटा लाडाने ओढत तो म्हणाला. आणि आंघोळीसाठी न्हाणीत शिरला. अनू काहीशी वैतागली. भर दुपारी कसली 'दुसरी भूक?' तिने डबा लावला आणि कणिक मळायला घेतली.
 .............
 रात्र उलटून गेली होती. श्रीनाथच्या तृप्त होऊन शांतपणे झोपलेल्या निरामय चेहेऱ्याकडे अनू एकटक पहात होती. श्री म्हणतो, शरीरसुखातून माणसाला केवळ तृप्ती मिळत नाही तर उर्जा मिळते. काम करण्यात नवा उत्साह येतो… हुरूप येतो. मनाची सहजपणे एकाग्रता होते. पण ही उर्जा दोघांना मिळते का?... हा प्रश्न मनात येताच ती खुदकन स्वतःशीच हसली. हे तत्वज्ञान आजचं, लग्नाच्या आधी? तेव्हा तर लग्न न करण्याचा निश्चय होता. आणि कूस बदलून तिने परत डोळे मिटले.
 श्रीनाथला मधेच जाग आली तेव्हा अनू मंदपणे घोरत होती. "अने किती प्रेम आणि माया करतेस ग माझ्यावर! माझ्यासाठी इतक्या दूर, या वैराण भागात आलीस. माझ्यासारख्या फटींग माणसाशी एकरूप झालीस. माझ्या घरातील जुन्या… पारंपरिक विचाराची माणसं, रितीरिवाज. त्याच्यात सहजपणे स्वतःला मुरवून घेतलंस. घराच्या दोन वेळेची जबाबदारी स्वीकारलीस… हे सारं सहजपणे. कधी तरी खंत वाटते का गं मनाला?... अं?" अनुला जवळ घेत, तिच्या केसांवरून हात फिरवीत श्री बोलत होता. अनू गाढ झोपली होती.
 अनुराधाच्या स्वप्नात पुर्वीचे दिवस उभे राहत होते. ओहोटीचे पाणी मागे मागे जावे आणि समुद्रात बुडून गेलेली जमीन लख्खं दिसावी तसे.

 "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कलश भलेही यशवंतराव चव्हाणांनी आणला असल्याच्या घोषणा काँग्रेसवाले करीत असले तरी छातीवर गोळ्या झेलून हुतात्मा होणाऱ्या एकशेपाच जणांना आणि तुमच्या आमच्या सारख्या चळवळीत झोकून देणाऱ्यांना त्याचे श्रेय आहे. कुंपणावर बसलेल्यांचे कौतुक पुरे झाले!!" उदय


शोध अकराव्या दिशेचा / १४