पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पदर लावून हसे नि झोपडीत गडप होई. बायांशी बोलयाचे तर गल्ल्या बोळातून जायचे. या गल्ल्याही जातीच्या नावाने ओळखल्या जाणार ! भटवाडा, हटकर तिठा, देशमुखाची आळी वगैरे हिंडून खरातकाकांनी बुध्द वस्तीत नेले. तिथे बाया भरारा जमल्या. मत कोणाला देणार असे विचारल्यावर उत्तर एकच असे, 'मालकाला इचारून सांगू' 'कंच्या चित्रावर ठसा मारायचा ते आमचं लेकरू सांगल.' मांगोड्यात शिरतांना एका धिटुकलीने दिलेले उत्तर अनूला चक्रावून टाकणारे होते.
 'ताई, तुमी शिकलेल्या हाय. मत कुनाला द्याच हे इच्चारू नये नि सांगू बी नये. एवढ पन कळत नाव तुमाला? दिलकी खुसी मन का राज आमी मनाला येईल ते करू' तिचे ठसक्यातले बोलणे पुरे हातेय तोच खरात काकांनी तिच्या पाठीत धपाटा घातला.
 'सुभे कुनासंग वादतीस? ताई मोठया हाईत एवढं बी कळत नाही. आंदी पाया पड त्यांच्या.'
 सुभा खरातकाकांची भाची. तिचे वडिल लातूरला रहातात. ती आठवी पर्यंत शिकलेली होती. जरा उशीरा शहाणी झाली म्हणून एवढे शिक्षण झाले. तिला पाळी आली नि शिक्षण बंद झाले. शिक्षण झाल्यामुळे मॅट्रीक झालेला केजच्या तहसिलमध्ये चपराशी असलेला नवरा मिळाला. नवरा नोकरदार म्हणून घरात तिची वट होती. चार दिवस मामाकडे माहेरपणाला आली होती. अजून लेकरूबाळ नाही. सडी आहे. अनूने तिचा ठसका, पाणीदार डोळे आणि धिटाई मनात नोंदवून घेतली आणि ठरवून टाकले खरातकाकांना सांगून तिला प्रचारात सामील करून घ्यायचे.

 मतदाराचे नांव, पत्ता, यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता लिहून चिठ्ठयांचे ढीग घाल्याचे काम विद्यार्थीनी करीत होत्या. उषा देशमुख ही बी.ए.व्दितीय वर्गात शिकणारी विद्यार्थीनी. तिच्या वडिलांचा बंगला अंब्यात आहे. जमीन जुमला, बैल बारदाना, गायी गुरे राडी या लहान खेड्यात. चार भावांचे खटलं. सगळे भाऊ एकत्र राहत. ते गावचे जमीनदार सगळे भाऊशेती पाहत. घरातील मुलामुलींचे शिक्षण व्हावे या हेतूने उषाच्या आई आंब्याला रहात. विद्यार्थ्यांनीने काम कसे चालले आहे, हे पाहण्यासाठी आणि चिठ्यांचे गठ्ठे कार्यालयात पोचविण्याच्या निमित्ताने अनू उषाच्या घरी येत असे. उषाच्या आईशी तिची चांगली ओळख झाली. उषाच्या आईच्या बोलण्यातला हेल, लकब खूप ओळखीची वाटत असे. तिचे राहाणेही या


शोध अकराव्या दिशेचा / १२०