पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उंच उडवीत पळत होती. त्यातल्या एकाला बोलावून शेवरेमामांनी बुधाजी पांचाळाला बोलावून घेतले. भीमाप्पाचा थोरला दहावी नापास होऊन एका गॅरेजमध्ये काम करीत होता. तो आंब्याहून रात्रीच येतो. चंद्रभागा हुशार आहे. सातवीत शिकतेय. बुधाजीच्या घरी जाऊन श्रीनाथने लेकरांसाठी शंभर रूपये दिले. चंद्रभागाला पुढच्या साली आंब्याला आठवीत घाला असे बजावून लेकरांचे फोटो घेऊन तो आंब्याकडं निघाला. आईने ही मंडळी येण्यापूर्वीच श्रीनाथला आवडणारी खास मारवाडी 'घोटेडी खिचडी' केली होती. घी, दही, पापड, आचार... लोणचे हे खिचडीचे चार यारही हजर होते.
 रात्री देवठाण, दगडवाडीचे दहाबारा लोक आले. त्यात शिवादादा, अंकुश, आंजा, शेवंता मावशी, खरातकाका, राणू आणी ही मंडळी होती.
 'श्रीभैय्या, लई खराब झालात.' श्रीनाथला कडकडून भेटतांना अंकुशा म्हणाला, 'श्रीभैय्या तुम्ही आमच्यासाठी मोर्चे काढलेत, सरकारशी भांडण घेतलेत आमच्यासाठी. आणि शिक्षा मात्र तुम्ही भोगता आहात.' गोविंददादा, खरात यांनी खंत व्यक्त केली
 'आंजे, दादांच्या पाया पड. दादा, आंजी चांगलीच मुंबईकरीण झालीय. नाशकाला मिसावाल्यांसाठी पुस्तके गोळा करून पाठवणाऱ्यांत तीपण होती. दर शनिवारी गोरेगावला जाते. लोकाधार संस्थेत काम करते. यंदा बारावीला पास झाली. पण मला मात्र मुंबईत करमत नाय. डोळ्यासमोर सारखं गावाकडचं शेत दिसतं. काकानी, येऊन जा... येऊन जा असा लईच नाद घेतला व्हता. आंजाही चार वर्षात इकडे आली नव्हती. म्हणून काल हितं आलो. आन् तुम्ही आल्याचं कळलं.' अंकुशला किती बोलू नी किती नाही असे झाले होते.
 रात्रीचे अकरा वाजायला आले तरी घरातली गर्दी कमी होत नव्हती.
 दरवाजा बंद करण्यासाठी अनू गेली तर दारात, रोज खाली थांबणारे सीआयडीचे शिपाई भुरेवार भाऊ आणि साखरे काका उभे होते. 'श्रीभैय्या, आज वायरलेस आला व्हता. आमी कळवलंय तुमी हितंच आहात म्हणून. आमी खालीच बसतो. पाणी प्यायचं झालं तरी वैनीचं दार ठोठावायला लागतं. तुमी वैनीची काळजी करू नका. आमी माणसंच हाऊत. पण पोटाला भाकर देणारी चाकरी, करायलाच हवी. येतो आमी!' ते दोघे जिना उतरून गेले आणि अनूने दार लावून घेतले.


शोध अकराव्या दिशेचा / १०१