शरद जोशी यांची तीन पुस्तके 'स्वातंत्र्य का नासले?', 'अंगारमळा', 'खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने' आम्ही प्रकाशित केली. शेतकरी प्रकाशनाने त्यांची पूर्वी प्रकाशित केलेली पुस्तकेही आपण पुनर्प्रकाशित करावी हा आमचा मानस होता. त्या अनुषंगाने यापूर्वी प्रकाशित झालेले आणि अतिशय महत्त्वाचे ठरलेले शरद जोशी यांचे पुस्तक 'शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती' नवीन स्वरुपात सिद्ध करीत आहोत. भारतीय शेतीची पराधीनता हा लेख या पुस्तकास परिशिष्ट म्हणून जोडला आहे. आदरणीय सुरेशचंद्र म्हात्रे सरांच्या सुचनेनुसार जुन्या पुस्तकाची मांडणी तशीच ठेवलेली आहे. त्यात शब्दाचाही बदल केलेला नाही. तसेच पूर्वीच्या दोन्ही पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तवना तशाच ठेवलेल्या आहेत. पुस्तकातील आडकेवारी त्या काळातील आहे. इतका मुद्दा सोडला तर सर्व विवेचन आजच्या काळातही महत्त्वाचे ठरते हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
आमच्या प्रकाशन संस्थेवर विश्वास ठेवून सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी शेतकरी प्रकाशनाची पुस्तके पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार. संसदेच्या समितीपुढे खासदारांनी लिहिलेली पुस्तके सादर करण्यास सांगण्यात आले आणि शरद जोशी यांच्या असे लक्षात आले की आपण यादी तर दिली पण प्रत्यक्षात पुस्तके मात्र उपलब्ध नाहीत. ही खंत त्यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी बोलून माझ्याजवळ दाखवली होती. त्यांची सर्व पुस्तके प्रकाशीत करून त्यांची खंत दूर करण्याचा हा आमचा छोटासा प्रयास.
औरंगाबाद येथे संपन्न होणाऱ्या ११ व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. माझे सहकारी प्रविण योगी, श्रीकांत झाडे, संभाजी वाघमारे, भिमराव वाघमारे तसेच चित्रकार सरदार यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच पुस्तक अल्पकाळात देखण्या स्वरूपात प्रकाशित होऊ शकले.
श्रीकांत अनंत उमरीकर.