पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड देसाई, सुंदरलाल त्रिकमलाल सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेमधील तीन अधिकारी शाहनवाज खान, प्रेमकुमार सहगल आणि गुरबक्षसिंह धिल्लाँ यांच्यावर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपावरून खटला भरला, तेव्हा काँग्रेसने त्यांच्या बचावासाठी १७ वकिलांची एक समिती स्थापना केली. या समितीत स्वत: पंडित नेहरू, सरदार पटेल, तेजबहाद्दूर सप्रू आणि भुलाभाईही होते. परंतु बचावाचे मुख्य भाषण भुलाभाईंनी केले. प्रकृतीची पर्वा न करता, तीन महिने अविश्रांत परिश्रम करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार घेऊन असा युक्तिवाद केला की सदरच्या तीन अधिकार्‍यांना आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी नेताजींनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारच्या आदेशावरून शस्त्र हाती घेण्याचा अधिकार होता आणि त्यामुळे त्यांच्यावर इंडियन पीनल कोडच्या तरतुदींखाली खटला भरताच येत नाही. अर्थात सैनिकी न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही व या तिन्ही अधिकार्‍यांना जन्मठेप दिली. पण नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. नौदलातील खलाश्यांनी बंड केले. ब्रिटिशांनी भारत सोडताना या तिन्ही अधिकार्‍यांची सुटका करण्यात आली. या खटल्यातील बचावाच्या भाषणामुळे भुलाभाईंचे नाव सर्वतोमुखी झाले व भारतातील महान वकिलांच्या प्रभावळीत त्यांना अढळ स्थान प्राप्त झाले. परंतु थोड्याच दिवसांत प्रकृती खालावून भुलाभाईंचे निधन झाले. - शरच्चंद्र पानसे

देसाई, सुंदरलाल त्रिकमलाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, गुजरात उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश जानेवारी १९०१ सुंदरलाल त्रिकमलाल उर्फ एस.टी. देसाई यांचा जन्म प्रसिद्ध वकिलांच्या कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व अहमदाबाद येथे झाले. एलएल.बी. परीक्षेत त्यांना किन्लॉक फोर्ब्ज सुवर्णपदक मिळाले. नंतर ते इंग्लंडला गेले व १९२७ मध्ये बॅरिस्टर झाले. परत आल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. कालांतराने ते अपील शाखेतही वकिली करू लागले. दोन्ही शाखांमध्ये त्यांचा उत्तम जम बसला. एक विद्वान आणि विशेषत: उलटतपासणीत निष्णात वकील म्हणून ते नावाजले. वकिलीतील पंचवीस वर्षांच्या अनुभवानंतर १९५२मध्ये देसाई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मे १९६०मध्ये मुंबई राज्याचे विभाजन होऊन वेगळे गुजरात राज्य अस्तित्वात आले, तेव्हा न्या.देसाई यांची नियुक्ती गुजरात उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. त्या काळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय साठ असल्याने जानेवारी १९६१मध्ये ते मुख्य न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. गुजरात उच्च न्यायालयातील न्या.देसाई यांची कारकीर्द फक्त सात महिन्यांचीच असली, तरी तेवढ्या अवधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. त्याआधी मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीतही न्या.देसाई यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. कायद्याचे गुंतागुंतीचे किंवा संदिग्ध प्रश्न सोडवून त्यांच्यावर निर्णय देताना न्या.देसाई यांचा दृष्टिकोन संकुचित किंवा तांत्रिक बाबींवर भर देणारा नसे, तर व्यापक दृष्टीने साधक-बाधक विचार करून कायद्याचा उदारमतवादी अर्थ लावण्याचा असे. घटनेच्या कलम २२६ मधील तरतुदींनुसार ‘रिट’ जारी करण्याचा जो अधिकार उच्च न्यायालयांना आहे, त्याच्या व्याप्तीसंबंधी महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नानावटी प्रकरणातील फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यानंतर निर्माण झालेला गुंतागुंतीचा घटनात्मक प्रश्न उच्च शिल्पकार चरित्रकोश