पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड तांबे, यशवंत श्रीपाद एक संस्थापक सदस्य होते. आपले बंधू कमरुद्दीन तय्यबजी यांच्या बरोबर त्यांनी ‘सरमिया-ए-जमात-ए-सुलेमानी’ ही आणखी एक संस्था स्थापन केली. १८८०मध्ये ते या संस्थेचे सचिव, तर १८८२मध्ये अध्यक्ष झाले. त्याआधी १८७३मध्ये आणि १८७८मध्ये असे दोन वेळा ते मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. १८८२ ते १८८६ पर्यंत ते मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १८८५मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. तय्यबजी पहिल्यापासून काँगे्रसमध्ये सक्रीय होते. दोनच वर्षांत, १८८७मध्ये मद्रास येथे भरलेल्या काँग्रेसच्या तिसर्‍या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी तय्यबजी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. यावरून काँग्रेसमधील त्यांचे स्थानही स्पष्ट होते. जून १८९५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून तय्यबजींची नियुक्ती झाली. वर म्हटल्याप्रमाणे ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश आणि अर्थातच पहिले मुस्लिम न्यायाधीश. तोपर्यंतचे सर्व बॅरिस्टर न्यायाधीश इंग्रज होते; तर एक तात्पुरते आणि तीन कायम असे जे चार भारतीय न्यायाधीश तोपर्यंत झाले होते, त्यांच्यापैकी कोणीही बॅरिस्टर नव्हते. दुसरे म्हणजे, १८६२मध्ये उच्च न्यायालय स्थापन झाल्यापासून १८९५पर्यंत एकच भारतीय व्यक्ती न्यायाधीश असावी, असा जणू संकेत किंवा अलिखित नियम बनून गेला होता, तो तय्यबजींच्या नेमणुकीमुळे मोडला. मुंबईच्या वकीलवर्गात आणि मुंबईच्या एकंदर सार्वजनिक जीवनात तय्यबजी यांनी जे श्रेष्ठ स्थान मिळविले होते, त्याच्यावर त्यांच्या न्यायाधीशपदाने जणू कळस चढविला. ज्याप्रमाणे अल्पावधीतच ते एक प्रथितयश वकील बनले होते, त्याचप्रमाणे अल्पावधीतच एक उत्तम न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती झाली. वकिलांशी ते अतिशय चांगुलपणाने वागत, परंतु त्याचवेळी ते परखड आणि निर्भीड होते. ते स्पष्टवक्ते आणि तापटही होते, परंतु त्यांच्याकडून आपल्याला यथायोग्य न्याय मिळेल, याबद्दल तरुण, कनिष्ठ वकीलही नि:शंक असत. आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत न्या. तय्यबजी यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले. त्यापैकी कसोजी इस्सर विरुद्ध जी.आय.पी.रेल्वेकंपनी (म्हणजे आजची मध्य रेल्वे) या खटल्यातील निकाल हा त्यांचा एक उत्तम निकाल मानला जातो. मुंबई शहराचे सार्वजनिक जीवन उंचावण्यात आणि मुंबईला भारतीय राजकारणाचे केंद्र बनविण्यात न्या.तय्यबजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्या.रानडे यांचे समकालीन असलेले न्या.तय्यबजी त्यांच्याप्रमाणेच उदारमतवादी आणि राष्ट्रवादी होते. न्या.तय्यबजी यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय न्यायाधीश! ऑगस्ट १९०६मध्ये ते इंग्लंडला गेले असताना, दुसर्‍यांदा अशाच प्रकारे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून सूत्रे घेण्यासाठी ते लंडनहून मुंबईला येण्यास निघण्याच्या तयारीत होते, परंतु हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाले. - शरच्चंद्र पानसे / डॉ. विजय देव

तांबे, यशवंत श्रीपाद मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ३१ जुलै १९०४ यशवंत श्रीपाद तांबे यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण इंदौर आणि मुंबई येथे झाले. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएल.बी. झाल्यानंतर त्यांनी १९३०मध्ये नागपूर येथे वकिलीस सुरुवात केली. शिल्पकार चरित्रकोश ६३