प्रशासन खंड इनामदार, अरविंद सिद्धेश्वर | | ते । हो । अ ते औ । इनामदार, अरविंद सिद्धेश्वर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य ११ नोव्हेंबर १९४० अरविंद सिद्धेश्वर इनामदार यांचा जन्म सांगलीतील तडसर या गावी झाला. वडील सिद्धेश्वर यशवंत इनामदार हे पट्टीचे पहिलवान होते. ते धाडसी होते. त्यांचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले होते. त्यांच्या आईचे नाव अहिल्या. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे घरात राहूनच त्या वाचायला, लिहायला शिकल्या. त्यांचे संस्कृतचे पाठांतर भरपूर होते. लहानपणापासूनच वाचनाचे वेड लागले. त्यामुळे भरपूर वाचन करण्याची सवय अरविंद इनामदारांनाही लागली. अरविंद इनामदार यांनी प्राथमिक शिक्षणास तडसर गावातून सुरुवात केली. त्यांनी येथे दुसरीपर्यंत शिक्षण घेतले, नंतर मात्र त्यांना शिक्षणासाठी पुणे गाठावे लागले. महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर वादातून ब्राह्मणांविरुद्ध उसळलेल्या रोषातून तडसर गावातील इनामदारांचा भव्य वाडा जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसानही झाले होते. तिसरीपासून पुण्यातील मॉडर्न विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या अरविंद इनामदारांनी पुण्यातीलच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच १९६४ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. १९७६ मध्ये नागपूर येथे गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी नक्षलवादी चळवळीचा कुप्रसिद्ध म्होरक्या कोडापल्ली सितारामैया याला बेड्या ठोकल्या. दोनशेहून अधिक व्यक्तींची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या कामगिरीमुळे त्यांना, तसेच त्यांच्या सहकार्यांना आंध्रप्रदेश सरकारने ५० हजार रुपयांचे रोख इनाम दिले. कुठच्याही राज्य सरकारने एखाद्या गुन्हेगारासाठी एवढ्या रकमेचे पारितोषिक यापूर्वी ठेवले नव्हते. मुंबईच्या गुन्हे विभागाच्या सह पोलीस आयुक्त पदाची सूत्रे १९८७ मध्ये हाती येताच त्यांनी येथील माफियाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. पाकमोडीया स्ट्रीटवरील कुविख्यात दाऊद इब्राहिमच्या मुख्य अड्ड्यावर त्यांनीच प्रथम छापा टाकला. या कारवाईत त्यांनी अडीच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या विभागात सेवा बजावताना अरविंद इनामदार यांनी कुप्रसिद्ध छोटा शकील याला व त्याच्या पाठोपाठ अरुण गवळीला अटक केली. गवळीला तर अकरा वर्षे गजाआड घालवावी लागली. अरविंद इनामदार यांच्यामुळेच गुन्हेगारी जगतावर दरारा निर्माण करणारा ‘टाडा’ कायदा महाराष्ट्रात प्रथमच लागू करता आला. या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारी आणि माफिया यांना वेसण घालता आली. पोलीस आयुक्त म्हणून १९९१ मध्ये नागपुरात पुन्हा एकदा त्यांचे आगमन झाले. वादग्रस्त बाबरी ढांचा पाडल्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगलीचा वणवा भडकला असताना नागपुरात सुव्यवस्था ठेवण्यात मिळालेल्या यशाबद्दल येथील नागरिकांनी त्यांना दुवा दिला. जळगाव-परभणी सेक्स स्कँडल त्यांनी उजेडात आणले.
शिल्पकार चरित्रकोश १६९