पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य खंड
सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश
 

 ललित वाङ्मयापेक्षाही क्रीडाविषयक लिखाण अधिक आवडीने, उत्सुकतेने वाचणारे वाचक भरपूर आहेत हे लक्षात आल्यावर, संधी मिळेल तेव्हा विविध खेळांच्या जन्मकथा, इतर माहिती मिळवून ते अभ्यासपूर्ण, सखोल लेखन करीत राहिले. जगात जे अनेक खेळ आहेत ते मुळात कसे निघाले, वाढले ते समजून घेण्याच्या जबरदस्त जिज्ञासेतून त्यांनी हे क्रीडाविषयक लेखन मराठीतून सातत्याने केले आहे.

-प्रा. मंगला गोखले



सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश
विचारवंत, निबंधकार, कथालेखक
१० जुलै १९०४ - ४ मार्च १९८५
भारतीय तत्त्वज्ञान आणि तत्कालीन लोकसत्ताक राष्ट्रधर्माचा विचार करणाऱ्या डॉक्टर पु. ग. तथा पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी लोकशाहीचा, तसेच विज्ञान- प्रणीत समाजरचनेचा आयुष्यभर सातत्याने पाठपुरावा केला, समाजप्रबोधनासाठी व्याख्याने दिली, लेखमालांसह ग्रंथलेखनेह केले. 'ग्रंथ हेच गुरू' ही त्यांची धारणा होती. या विचारवंताचा जन्म पुणे येथे झाला.
 लहानपणी मनात वैराग्यभावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी हिमालयात जाऊन जपाचा आणि ध्यानाचा प्रयोग केला. पण त्यातले वैयर्थ्य जाणवल्याने लौकिकात परतून ते १९२४ मध्ये मॅट्रिक झाले. याच वर्षी त्यांचा प्रा. श्री. म. तथा बापूसाहेब माटे यांच्याशी परिचय झाला; तो त्यांच्या आयुष्याला वळण लावणारा, संस्कार करणारा ठरला. १९२८ मध्ये स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्यावर ते नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. १९२९ मध्ये मित्रवर्य वि. कृ. दातार यांच्या भगिनी द्वारकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९३१ मध्ये ते एम. ए. झाले.
 १९३१ मध्ये सहस्रबुद्धे यांनी 'किर्लोस्कर' मासिकातून कथालेखनाला आरंभ केला. १९३४ मध्ये त्यांच्या 'लपलेले खडक' या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन झाले. कथांतून 'कुणबी' सारख्या बोलीभाषेतून संवाद साधणाऱ्या या कथांत जिवंतपणा असला, तरी त्यांचे वळण बोधवादी होते. येथे केतकर, वा. म. जोशी, सावरकर यांच्या ललित लेखनाशी जवळीक जाणवत होती. १९३३ मध्ये त्यांचे पहिले नाटक 'सत्याचे वाली' हे प्रसिद्ध झाले आणि दुसरे नाटक 'वधू संशोधन' १९३७ मध्ये प्रसिद्ध झाले. मात्र त्यांचे प्रयोग झाल्याचे उल्लेख नाहीत.
 याच सुमारास हिंदूंच्या समाजरचनाशास्त्रावरचा गो. म. जोशींचा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. प्राचीन हिंदू समाजाला स्मृतिकारांनी दिलेली शिकवण आजच्या काळात निरुपयोगी असून तीत आमूलाग्र बदलाची गरज त्यांना जाणवली. लोकांच्या आचार-विचारांतील भ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म आणि दीर्घ अभ्यासाअंती त्यांनी उद्योगप्रधान 'विज्ञानप्रणीत समाजरचने'च्या प्रयोगावर भर दिला. भोवतालच्या समाजातील धर्मादी व्यावहारिक प्रश्न, समोरची आव्हाने तपासून आणि विज्ञानाच्या मर्यादा ध्यानी घेत त्यांनी नवे चिंतन मांडले. आपल्या १९३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'विज्ञानप्रणीत समाजरचना' या ग्रंथातून व्यक्तिस्वातंत्र्याचे माहात्म्य सांभाळत समाजकल्याणासाठीचा नवा मार्ग त्यांनी दाखवला. या ग्रंथाचे अभ्यासकांत स्वागत झाले. शिवाय त्यास भोरचे 'शंकराजी नारायण' हे पारितोषिकही मिळाले.
 यानंतर त्यांनी १८५८ ते १९३८ या काळातील मराठी ललित साहित्यातील 'स्वभावलेखन' या विषयावर प्रबंध लिहिला. त्यांना साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे मार्गदर्शक लाभले, तर वा. म. जोशी हे परीक्षक होते. १९३९ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे पहिले पीएच.डी. झाले. आपण 'ग्रंथकार' व्हायचे असा मनोमन निर्णय करून आणि 'भारताचा उत्कर्ष' हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी ललित लेखनाकडे पाठ फिरवली आणि


शिल्पकार चरित्रकोश
६२७