पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चित्रपट सृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ असा विपुल पत्रव्यवहार अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. तो एकत्र करून त्याची वर्गवारी विषय, आशय, शैली, पत्रपद्धती, पत्रस्वरूप, मायने, प्रशस्ती, हस्ताक्षर इ. अंगाने करून त्यातून वि. स. खांडेकरांचा पुनर्णोध शक्य आहे. या व्यापातून दिसणारे खांडेकर म्हणजे माणूसपणाचं मोहोळ होय. लोकाभिमुख होणं ही खांडेकरांची उपतज वृत्ती होती. तो त्यांचा स्वभाव होता. प्रारंभी मित्रांनी गोष्टी सांगणं, नंतर लेखन, भाषण, पत्र लिहिणं, आल्या-गेल्यांशी बोलत राहणं यातून ते स्पष्ट होतं. संपर्कात आलेल्या प्रत्येकास खांडेकर आपले वाटत. याचं रहस्य त्यांच्या संवाद शैली व कौशल्यात आहे. लहान-मोठा असा भेद त्यांनी संवादात कधी केला नाही. प्रत्येकास आपल्या मनातलं सांगून निश्चित होण्याचे ठिकाण होते खांडेकर! त्यांचं हे रूप चर्चच्या त्या पाद्रयाप्रमाणे असायचं. जो तो येऊन आपला कबुलीजबाब देऊन मोकळा व्हायचा. हे केवळ वयाचं मोठेपण नव्हतं. त्यात प्रतिभेचा चमत्कार, विचार वैभव, भाषासौंदर्य व सर्वांत महत्त्वाचे आत्मीयता होती.

 आत्मीय खांडेकर कुणाच्या श्रद्धेचा तर कुणाच्या असूयेचा भाग ठरले. पण खांडेकरांनी त्याचा विचार न करता आपलं मैत्र जपलं. हे मैत्र बाबा आमटे, बाबा मोहोड, विनोबांशी होतं; तसंच डॉ. श्रीराम लागू, वसंत कानेटकर, रणजित देसाई यांच्यासाठीही होतं. नाटक आणि खांडेकर, सिनेमा आणि खांडेकर, समाजसेवक आणि खांडेकर असेही पत्रव्यवहाराच्या अभ्यासाचे विषय होऊ शकतील. वा. रा. ढवळे, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, ग. पां. परचुरे, द. ना. मोघे, अनंत हरी गद्रे, नामदेवराव व्हटकर यांच्यासारखे प्रकाशक असोत वा किर्लोस्कर, मित्र, विरकुड, यदुनाथ थत्ते यांच्यासारखे संपादक असोत, सर्वांशी वि. स. खांडेकरांचा पत्र संवाद असायचा. वाचकांशी संवाद हे खांडेकरांचे आगळे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. चिमुरड्या वाचकासही ते लिहीत. त्यात मराठी, गुजराती, बंगाली भाषिकांचा समावेश असायचा. कोण सहमत तर कोण असहमत. असहमतांशीही सख्यपूर्ण संवादात खांडेकरांचं मोठेपण सामावलेलं दिसतं. खांडेकर कुणास सविस्तर तर कुणास त्रोटक लिहीत, पण आलेल्या प्रत्येक पत्रास उत्तर धाडायचा त्यांचा प्रयत्न असायचा. स्वतःहून लिहिण्याचीही त्यांना सवय होती. विशेषतः नवोदितांना त्यांचे लेखन वाचून प्रशस्ती कळवायची सवय केवळ अनुकरणीय होती. वि. स. खांडेकरांनी मराठी माणसाच्या मनात जे आदराचं सीन निर्माण केलं होतं, ते केवळ साहित्यातून नाही तर पत्र, मैत्री,

शब्द सोन्याचा पिंपळ/९५