पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याच भावनेतून कबीरांनी पूजन, अर्चन, तीर्थाटन आदी कर्मकांडास विरोध केला. समाजातील अंधश्रद्धेचं निर्मूलन ख-या अर्थाने थांबायचं असेल, तर 'भातुकलीचे बाळखेळ थांबायलाच हवेत यावर कबीरांचं एकमत होतं. ते आपल्या मतावर दृढ होते. ईश्वर हा बोधगम्य नाही- दिसत नाही, आकार नाही मग पूजन-अर्चनास अर्थच काय? ज्या साच्या व्यवहाराची इमारत संशय, आशंकांवर उभी आहे ते नाकारायला हवं, ठोकरलंच पाहिजे याबाबत कबीरांचं दुमत नव्हतं म्हणून तर ते म्हणाले होते की-

 पूजा-सा वह नेम वृत, गुडिया-का-सा खेल।

 जब लग प्रिय दरसै नहि, तब लग संशय मेल।।

 निःसंशय समाज निर्मिती ही कबीरांच्या साच्या धडपडीमागचं ध्येय होतं. कबीर अंधश्रद्धमुक्त माणसांचं स्वराज्य निर्मू इच्छित होते. याच विचारांनी कबीरांनी मालाजपासारख्या कर्मकांडाचाही विरोध केला होता. बाह्याचाराच्या प्रदर्शनापेक्षा अंतर्भुद्धीस कबीर अधिक महत्त्व द्यायचे. रामनाम जपातील ‘र' कार, ‘म'कारापेक्षा कबीर मनःशुद्धीस श्रेष्ठ मानायचे. 'मन चंगा तो कठौती में गंगा' सारख्या विचारांवर त्यांची अटळ श्रद्धा होती. प्रकट नामस्मरणापेक्षा अंतर्भुद्धी महत्त्वाची कशी ते समजावत ते म्हणाले होते-

 कर में तो माला फिरे, जिभ फिरे मुख माहि।  मनुआ तो चहुदिसी फिरे, यह तो सुमीरन नाहि।।

 ‘देह देवळात चित्त खेटरात' अशी अंतर्बाह्य विसंगत धर्मपद्धती केवळ अंधश्रद्धेची परिणती होय यावर कबीर ठाम होते. धर्माच्या नावावर निष्पाप प्राण्यांचा बळी देण्यामागील धर्मपंडितांचा स्वार्थ कबीर ओळखून होते. म्हणून त्यांनी अशा बळी प्रथेचा प्राणपणाने विरोध केला. 'साई के सब जीव है, कीरी कुंजर दोय' अशी धारणा असलेले कबीर पशु-पक्षी, कीटक या सर्वांठायी ईश्वर मानणारे संत होते. धर्माच्या नावावर पशुहत्या जोपासणाच्या मनुष्यास त्यांनी बेभरवशाचा प्राणी मानलं होतं त्यामुळेच-

 बकरी पाती खात है, ताकी काढी खाल।।

 जो नर बकरी खात है, तिनके कौन हवाल।।

 गवत खाऊन जगणाच्या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार- त्या पाश्र्वभूमीवर निष्पाप प्राण्याचा धर्माच्या नावावर बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार कबीर कसे मान्य करतील?

शब्द सोन्याचा पिंपळ/७५