ज्यू नैनू में पुतली, त्यू खलिक घट माँहि।
मूरिख लोग न जाणहि, बाहरि ढूंढण जाहि।।
‘अमृत घट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी,' अशी पृच्छा करणारा भा. रा. तांब्यांसारखा कवीही प्रेम, ईश्वर, मनुष्यता, नातीगोती सारी मनाची गुंफण असल्याचं सांगतात, त्यामागे कबीरांचाच विचार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कबीर, प्रत्येक सजीव-निर्जीवात ईश्वर सामावल्याचं सांगून तो अंतरीच विराजमान असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगाची जीवघेणी धडपड ही आत्मनाशासच कारण ठरणारी असते, हे सांगत श्रद्धा डोळसच असली पाहिजे, हे कबीर निक्षून सांगतात. म्हणतात-
कस्तुरी कुंडली बसै, मृग हँडै बन माहि।
ऐसे घटि-घटि राम है, दुनिया देखे नाहि।।
ते खरंही आहे.
पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये, तीर्थाटन, बांग देणे, माला जपणे, दाढी वाढवणे, मुंडन करणे, बळी देणे यांसारख्या अघोरी कर्मकांडांचा कबीरांनी केलेला विरोध हा अंधश्रद्धांचा समूळ उच्चाटनाचा कृतयज्ञच होता असं म्हटलं तर ते वावगंही ठरू नये, शिवाय अतिशयोक्तही. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मामधील कर्मकांडांवर त्यांनी समान हल्ला चढवला.
कंकड पत्थर जोड़ के, मसजित लई बनाय।।
तापर मुल्ला बांग दे, क्या बहिरा हुआ खुदाय।।।
आरडून ओरडून धर्मश्रद्धांचं प्रदर्शन करणा-यांना कबीरांनी केलेला प्रश्न की 'खुदा काय बहिरा आहे?' त्यामागे धर्मप्रदर्शनाला विरोध करण्याचीच भावना स्पष्ट दिसते.
पूजा-अर्चा करताना सोवळे-ओवळे, स्नान, तिलक, छापा आदी ब्राह्माचारही अंधश्रद्धेचाच भाग असल्याने कबीरांना ते अमान्य होतं. बाह्याचारांच्या अंधानुकरणापेक्षा अंतर्विवेक जागा ठेवणं, तो जोपासणं कबीरांना अधिक महत्त्वाचं वाटायचं. विवेक ही माणसात नीर-क्षीर न्याय जागवणारी क्षमता होय. तिचा विकासच माणसास अंधश्रद्धेतून मुक्ती देईन, मोक्ष देईल असं कबीरांना वाटायचं, म्हणून ते एकदा वैष्णवांना विचारते झाले होते की-
वैष्णव भया तो का भया, उपजा नहीं विवेक।
छापा, तिलक बनाय कै, दग्ध्या (जल गये) लोग अनेक।।
अंधश्रद्धेत आजवर कित्येक दग्ध झाल्याची कबीरांची व्यथा समाजास अंधश्रद्धा मुक्त करू इच्छित होती.