पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार



 गांधी विचार, गांधी दर्शन, गांधी तत्त्वज्ञान अशा अनेक पद्धतीने महात्मा गांधींच्या आचार व विचारांचा धांडोळा घेत असताना एक गोष्ट व्यवच्छेदकपणे लक्षात येते की महात्मा गांधींनी आपले जीवन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञानावर उभारले असले तरी त्याचा पाया समाजरचना हाच आहे. या विचारात आचार व तत्त्वज्ञानाचं अद्वैत आहे. ज्याला आपण स्थूलमानाने ‘गांधी विचार' म्हणून संबोधतो. खरा तर तो एक ‘आचारधर्म' आहे. गांधी विचारात आचाराचे, अनुसरणाचे असाधारण महत्त्व आहे. गांधी विचार भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहू लागल्यास, तो वरकरणी अध्यात्माकडे जाणारा वाटला तरी त्याचं कर्मकांड धार्मिक न राहता ते सामाजिकतेकडे अधिक झुकताना दिसतो. म्हणून गांधी विचार ही एक ‘समाज जीवन धारणा पद्धती' आहे आणि ती सामाजिक धर्मबुद्धीवर उभी आहे.

 महात्मा गांधींचा जगातील सर्व धर्मांचा अभ्यास होता. असे असल्यामुळे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान म्हणून जे घटक पुढे येतात ते दुसरे तिसरे काही नसून सर्व धर्मातील ती अनुकरणीय तत्त्वे होत. बुद्धाची करुणा, ख्रिस्ताची दया, इस्लामचा निर्गुण ईश्वर, महावीराचा अपरिग्रह व निग्रंथ आचार, शिखांची कारसेवा अशांतून त्यांची एकादशव्रते सिद्ध झाली आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, अभय, सर्वधर्मसमभाव, स्वदेश भावना, अस्पृश्यता, नम्रतासारखी तत्त्वे माणसात सामाजिक धर्मबुद्धीच जागवतात.

 म. गांधी हिंदू धर्म पायाभूत मानून अन्य धर्मांचा विचार करतात. त्यांच्या सामाजिक धर्मात पूजा-अर्चा नसली तरी प्रार्थना आहे. व्रत नसले

शब्द सोन्याचा पिंपळ/१४८