पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



तरी उपवास आहे. शिक्षा नाही पण प्रायश्चित्त आहे. विषमतेच्या जागी ते समानता स्वीकारतात. गुलामीऐवजी स्वातंत्र्य ते पसंत करतात. भारत गरिबांचा देश असल्याने ते खादी, स्वदेश, साधेपणाचे मूल्य मानतात. श्रमप्रतिष्ठा हे प्रतीक नसून तो दैनिक व्यवहाराचा भाग आहे. शेती, सूत कताई, स्वावलंबन, सेवा इत्यादीतून तो स्पष्ट होतो.

 महात्मा गांधींच्या सामाजिक धर्मबुद्धीचे ध्येय माणुसकी व मानवतावाद आहे. म्हणून ते अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, कुष्ठसेवा, ग्रामसफाई यांचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांचा मानवतावाद नीती, राजकारण, अर्थकारण यांचा साकल्याने विचार करून साकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही या पंचशीलाचा त्यांचा आग्रह मानवाचे जिणे अधिक उंचावावे, या ध्यासातून आलेला आहे. सत्य हा त्यांचा ईश्वर आहे. गरीबदास त्यांचा राम आहे. गुलामीचं निर्दालन मग ते सामाजिक असो वा राजकीय याचा ते निकराने आग्रह धरतात. सविनय अवज्ञा आंदोलन, उपोषण, सत्याग्रह इत्यादी उपायांनी ते सामाजिक जागृती करतात. त्यामागे लोक सहभागाचा होरा असतो. सत्याच्या वेगवेगळ्या प्रयोग, उपक्रमातून त्यांची समाजशास्त्रीय बैठक स्पष्ट होते.

 महात्मा गांधींच्या विचारात व्यक्ती व्यवहारात व्यक्तिगत आचरणास अधिक महत्त्व आहे. ते स्वातंत्र्याचे भोक्ते असल्याने विचारात कोणतीही गोष्ट अनिवार्य मानत नाहीत. स्वत्त्व, सत्त्व, स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वदेश भाव या साच्यामागे 'स्व' प्रज्ञतेचा आग्रह आहे. लादलेली कोणतीही गोष्ट अनिच्छेने होते. उलटपक्षी ‘स्व' स्वीकृत बाब परिणामकारकपणे कार्य करते. महात्मा गांधींचा विचार व व्यवहार अशा दोन्ही पातळ्यांवर बुद्धीपेक्षा भावनेस महत्त्व देतो. त्यामुळे त्या विचारात आत्मशुद्धी, निग्रह, स्वीकार, आत्मक्लेश, आत्मनिर्भरता यांचे अतूट नाते आहे. हृदय परिवर्तनावर त्यांची निष्ठा असण्यातून त्यांच्या विचारातील आतल्या आवाजाचं महत्त्व स्पष्ट होतं. विवेकास ते विकाराचा उतारा मानतात. विखार त्यांना अमान्य आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभदी षड्रिपूंना ते थारा देत नाहीत. कारण ते ईश्वराप्रमाणे माणसास ‘पूर्ण' पाहू इच्छितात. गांधी विचार हा स्वप्नरंजन नाही, समाजधारणेचा तो एक ध्यास आहे. गांधी विचारात अहिंसा तत्त्वास असाधारण महत्त्व आहे. त्यांच्या दृष्टीने अहिंसा हा मानववंशाचा जीवन धर्म आहे. हिंसा मग ती शारीरिक असो वा मानसिक, महात्मा गांधी ती वर्त्य मानतात. हिंसेमुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात

शब्द सोन्याचा पिंपळ/१४९