पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
वैयक्तिक व सामाजिक

सोळाव्या शतकात रोमचे पोप लोकांना असलीच पुण्यदृष्टी शिकवीत असत. त्याचा परिणाम काय झाला ते इतिहास सांगतोच आहे.
 धर्माला सामाजिक अर्थ प्राप्त करून दिल्यामुळे, मानवाचे इहलोकीचे सुख हेहि धर्माचे एक प्रधान कार्य आहे ही दृष्टि ठेविल्यामुळे पाश्चात्त्य समाजांना केवढे सामर्थ्य प्राप्त झाले त्याचा आपण विचार केला तर आज आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे हे आपल्याला सहज पटेल, असे वाटते. पाश्चात्त्य राष्ट्रात आजही धर्म ही एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे. विज्ञानयुग निर्माण झाले तेव्हा प्रथम धर्म हा पराभूत होऊ लागला. पण त्याचे कारण असें की त्या वेळच्या धर्मधुरीणांनीच धर्माला अवकळा आणली होती. एक तर हे धर्मधुरीण अत्यंत भ्रष्ट होते आणि दुसरे म्हणजे त्यांनी धर्माला कर्मकांडाचे रूप देऊन शब्दप्रामाण्य, निवृत्ति, संन्यासधर्म यांचे स्तोम माजविले होते. शास्त्रीय सत्याशी त्या आंधळ्या धर्मवेत्त्यांनी वृथा संघर्ष केला. त्यामुळेच त्यांच्या धर्माला हीन, अमंगल रूप प्राप्त झाले. पण लवकरच ख्रिस्तीधर्माचे अनुयायी सावध झाले. आणि धर्म ही प्रामुख्याने समाजसेवा आहे हे ध्यानी घेऊन त्यानी धर्मामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे विज्ञानयुगातहि धर्मश्रद्धा टिकून राहिली आणि मुख्य म्हणजे तरुण लोक धर्मासाठी म्हणजेच समाजसेवेसाठी रंजल्यागांजल्यांच्या अनाथ- अपंगांच्या सेवेसाठी सज्ज झाले. राष्ट्रावरची फार मोठी आपत्ति त्यामुळे टळली. धर्म ही केवळ वैयक्तिक पुण्याची व म्हणूनच पारलौकिक कल्याणाची बाब आहे असे जेथे ठरते तेथे तरुण रक्त त्याकडे वळत नाही, कारण तो म्हातारपणचा उद्योग आहे अशी त्यांची खात्री झालेली असते. आपल्या समाजात शेकडो वर्षे हीच भावना रूढ झालेली होती. लो. टिळकांच्या मनाला ही गोष्ट अतिशय लागून राहिली असली पाहिजे. 'गीतारहस्या'च्या प्रस्तावनेत त्यांनी मुद्दाम असे सांगितले आहे की, "निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्या-भागलेल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही, गीता सांगितली नसून संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय, याचा तात्त्विक दृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ति झाली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे हे प्राचीन शास्त्र प्रत्येकाने समजून घ्यावे. "