पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वंचितांचे विश्व : उपेक्षित जगाची ओळख

 दैनिक सकाळ, कोल्हापूर येथे मुख्य उपसंपादिका म्हणून कार्य करणाच्या कु. मीना शेटे यांचा संबंध वृत्तपत्रीय लेखन गरजेतून महिला, बाल व अपंग विकास संस्थांशी आला. प्रारंभीच्या काळात मागणी' म्हणून लिहिलेल्या लेखांनी त्यांच्या संवेदना जागवल्या व एका असाधारण बैचेनी व ध्यासातून ‘वंचितांचे विश्व' पुस्तक साकारले. साधारणपणे समाजशास्त्रीय बैठक लाभलेल्या, औपचारिकपणे समाजकार्य अध्ययन, अध्यापन नि संशोधन कार्य करणाच्या व्यक्तींनीच आजपर्यंत या विषयावर पुस्तके लिहिली. दुरान्वयानेही समाजशास्त्र नि समाज कार्य विषयाशी संबंध नसलेल्या मीना शेटे यांनी आपल्या लेखनासाठी ‘वंचितांचे विश्व का निवडले याचा शोध घेत पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आले की अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, परित्यक्ता, कुमारीमाता, हुंडाबळी, कुठरोगी, बालगुन्हेगार अशा कितीतरी प्रकारे सामाजिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारे वंचित व उपेक्षित राहिलेल्यांचे दुर्लक्षित असे जग आहे. या जगाकडे अधिक डोळसपणे नि संवेदनशील बघण्याची गरज आहे हे त्यांना जाणवले. या जाणिवेतून ‘वंचितांचे विश्व' ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचा विवेचक व चिकित्सक अभ्यास करणारा ग्रंथ साकारला.
 मला आठवते, एका वर्षापूर्वी त्यांना काही कारणाने मोकळेपण लाभले. हे मोकळेपण इष्टापत्ती मानून त्यांनी हा ग्रंथ आकारला. मीना शेटे या मितभाषी, चिंतनशील व संवेदनक्षम अशा पत्रकार लेखिका आहेत. वृत्तपत्रीय लेखन हे ब-याचदा ‘रतीब' म्हणून लिहिले जाते. रतीबाच्या दुधाला सकसपणाची डिग्री लावायची नसते असा संकेत असतानाही त्या आपले प्रत्येक लेखन हे परिश्रमपूर्वक करतात. हे पुस्तक त्याचा ठळक पुरावा होय.
 कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी प्रयत्न नि धोरणांमुळे एक सामाजिक झालर आहे. छत्रपती शाहूंनी येथे निर्माण केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे सामाजिक संस्थांचे जाळे जिल्ह्यात पसरणे स्वाभाविक होते. संस्था स्थापन होतात, स्थिरावतात, विकसित होतात, पण त्या मागे



वेचलेली फुले/५१