पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना
 कै. प्रा. ती. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे 'विज्ञानप्रणीत समाजरचना' हे पुस्तकं १९३६ मध्ये प्रसिद्ध झाले; त्याला आता पन्नास वर्षे झाली आहेत. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा योग येईल अशी कल्पना नव्हती. 'मधुवन ग्रंथ प्रकाशना'चे श्री. मधुसूदन वनपाल यांनी तशी इच्छा व्यक्त केली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
 कै. प्रा. पु. ग. सहस्रबुद्धे विज्ञानवादी होते. हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी विज्ञानाच्या आधारे नवसमाजरचना करण्याविषयी त्यांनी या पुस्तकात जे विवेचन केले आहे, ते आजही उपयुक्त ठरेल असे वाटते. मन्यादी स्मृतिकारांचे समाजशास्त्र यशस्वी ठरलेले नाही; ते आमूलाग्र बदलावयास पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. कोणत्या नव्या तत्त्वांच्या आधारे समाज-रचना करावी, ते या ग्रंथात सांगितले आहे. समाज रचनेत अशी क्रान्ती करण्यासाठी आपण भौतिक शास्त्रांची कास धरली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. त्यांची भूमिका शास्त्रशुद्ध असून त्यांनी समाजशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांचा विचार आपल्या सामाजिक इतिहासाच्या आधारे केला आहे.
 गेल्या वीस-पंचवीस वर्षांत विज्ञानाच्या योगाने जीवनाला नवे वळण लावण्याकडे समाजाचा कल दिसू लागला आहे. त्या संदर्भात या पुस्तकातील विचार आधारभूत ठरतील अशी अपेक्षा आहे.
 श्री. मधुसूदन वनपाल यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मनावर घेतले आणि ते काम पूर्ण केले, या बद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !

- व. ग. सहस्रबुद्धे