पान:विचार सौंदर्य.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'

अलीकडे महाकाव्यें कां निर्माण होत नाहींत ?'


 कित्येकांना असे वाटतें कीं, ज्ञान फार वाढल्यामुळे ( _'_अक्कल' फार वाढल्यामुळे म्हणा पाहिजे तर ! )कवित्व अशक्यप्राय होत चाललें आहे, अर्थात् महाकाव्य सुतराम् अशक्यप्राय झाले आहे. मेकॉलेनें मिल्टनवरील आपल्या सुप्रसिद्ध निबंधांत संस्कृतीच्या प्रगतीबरोबर कवित्वाची परागति होते असें प्रमेय मांडलें व तें कांहीं लोकांना प्रथमदर्शनीं खरें दिसलें. पण बारकाईनें विचार केल्यावर आधिभौतिक काय, आध्यात्मिक काय, किंवा कोणत्याहि काय, ज्ञानाचा व कवित्वाचा 'अहि-नकुलवत् ' किंवा 'तमः प्रकाशवत् ' विरोध आहे हें खरें दिसत नाहीं. ज्ञानानें असें काय केलें आहे कीं, त्यामुळे कवित्वानें त्यापासून भिऊन चार पावलें दूर असावें ? ज्ञानाच्या उष्णतेनें कवित्व करपतें; ज्ञानाच्या प्रखर प्रकाशांत कवित्वाचे डोळे दिपतात, इत्यादि प्रकारची अलंकारिक भाषा तर्कशुद्ध प्रमाणाची योग्यता पावूं शकत नाहीं. कवितादेवीला शब्द चित्रलेखनाकरितां व इतर वाग्विलासाकरितां वर्ण्य विषय म्हणून चंद्रिकायुक्त किंवा अंधकारमग्न रात्र प्रिय असते. मनुष्यजातीच्या किंवा व्यक्तीच्या अज्ञानान्धकारांतच तिला वाचा फुटते, किंवा तिची वाणी मधुरता धारण करते असे का म्हणावयाचें आहे ? अरुणोदय व उष:काल काव्यात्मक वर्णनाला अनुकूल असतात, म्हणून मानवी संस्कृतीचा किंवा व्यक्तीच्या शैक्षणिक संस्कारांचा अरुणोदय किंवा उषःकाल कवित्वस्फूर्तीला अनुकूल असतो असें तर म्हणणें नाहीं ? त्यांतली खरी गोष्ट अशी आहे कीं, ज्ञानामध्ये किंवा अनुभवामध्यें प्रगति होऊन मनुष्याला किंवा मनुष्यजातीला प्रौढत्व आले तर त्यामुळे कवितादेवी लाजते किंवा रुसते, किंवा रागावते, अथवा क्षीण होते, या म्हणण्याला इतिहासाचा किंवा तर्काचा कांहींच आधार नाहीं. टेनिसन, ब्राऊनिंग, गटे (Goethe), हे काय अज्ञानयुगांतले आहेत, का ते अज्ञानी होते ? रविंद्रनाथ टागोर हे चांगले ज्ञानी, विचारी, अनुभवी व तत्त्वचिकित्सक आहेत; मग कवित्वानें त्यांच्याशीं कशी गटटी केली ? ज्ञानावर जर कविता- देवीचा राग असता व अज्ञान जर तिला प्रिय असतें तर ज्ञानविहीन बालक