निवडणुका जाहीर झाल्या होत्या व त्या वेळच्या प्रचाराच्या धामधुमीत त्यांना लग्नासाठी पुरेशी सवड मिळणार नव्हती. स्थळ उत्तम होते, त्यामुळे कुठच्याही परिस्थितीत हे लग्न व्हावे अशीच घाटगे परिवारातील सगळ्यांची इच्छा होती; पण अमृतराव परत यायची वाट बघावी आणि मग लग्न करावे असे घाटगे मंडळींचे मत होते. इकड़े दातार मंडळी मात्र अधिक थांबायला तयार नव्हती. अशा वेळी वसंतराव पुढे झाले. त्यांनी सगळा पुढाकार घेतला. त्यानुसार मग लग्न नक्की झाले. अर्थात इतर भाऊही मदतीला होतेच. प्रत्यक्ष कन्यादान सखारामपंतांनी केले. पुष्पा- अनंत यांचे लग्न २४ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाले. बळवंतराव केंद्रात मंत्री असल्याने त्यांचा मुक्काम दिल्लीतच असायचा. त्यासाठी केलेला प्रवास म्हणजे मोठी गमतीदार आठवण आहे. सगळी मिळून एकूण तीसेक माणसे लग्नाला जाणार होती. एकूण दोन गाड्या घेऊन वहऱ्हाड कोल्हापूरहून निघाले. सखारामपंतांची स्टुडीबेकर आणि वसंतरावांचा फार्गो-डॉज (Fargo-Dodge) हा हाफ टनाचा ट्रक. स्टुडीबेकरमध्ये सगळी मोठी माणसे होती आणि फार्गो-डॉजमध्ये सगळ्या मुलांबरोबर वसंतराव होते. हाफ टन ट्रकच्या त्या चासीवर एक खास बसची बॉडी ह्या प्रवासासाठी म्हणून वसंतरावांनी बनवून घेतली होती. दोन्ही बाजूंना बसण्यासाठी आसने होती आणि मध्ये बरीच मोकळी जागा. तिथे एकावर एक अशा पातळ गाद्या रचलेल्या. वाटेत प्रत्येक मुक्कामाच्या वेळी झोपायची सोय करण्यासाठी. आठ दिवस जाण्यात व आठ-दहा दिवस येण्यात असा तो मोठा दौराच वसंतरावांनी आखला होता. पुणे, औरंगाबाद, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा असे पडाव घेतघेत सगळे व-हाड दिल्लीला पोचले. लग्न उरकून परत येताना पुन्हा उरलेले स्थलदर्शन, वा गाणी म्हणत, गप्पाटप्पा करत, वेळोवेळी खाण्यासाठी थांबत सगळा प्रवास झाला. बरोबर सर्व प्रवासासाठी पुरेल असे फराळाचे पदार्थही त्यांनी कोल्हापूरहूनच करून नेले होते. त्या वेळी वसंतराव मुलांना चक्क सरदारजी जोक्सही सांगत होते! त्या प्रवासादरम्यानची एक आठवण सांगताना प्रभाताई कुलकर्णी म्हणतात, “ प्रवासात मुलांनी कोणी आजारी पडू नये म्हणून वसंतकाका अतिशय काळजी घेत होते. मुख्य म्हणजे त्यांनी सगळ्यांच्या खाण्यावर कंट्रोल ठेवला होता. वेळेत नाश्ता, जेवण, रात्री अगदी लाइट खाणं. एरव्ही कितीही भूक लागली, तरी कोणी काही खायचं नाही. एकदा वाटेत कुटुंबातले वसंतराव | १५५ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१८९
Appearance