पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे असतात की, ज्यांना सत्तेत यायचे असते, त्यांनाही निवडणूक हवी असते. आणीबाणीच्या काळात सत्ताधारी पक्षातील एका अतिशय वरिष्ठ नेत्याने बोलता बोलता मला सांगितले, तुम्ही मंडळी निवडणूकांच्याविषयी इतका विचार का करता, हेच मला कळत नाही. निवडणुकीची खरी गरज आम्हाला आहे. नको असलेले लोक संसदेतून बाहेर काढणे आणि हवे असलेले लोक संसदेत घेणे, यासाठी निवडणूक हा सर्वांत मोठा निरुपद्रवी मार्ग आहे. तुम्ही मंडळींनी मागितली काय, न मागितली काय, निवडणूक घेणे आम्हाला भागच आहे. सत्ताधारी पक्षांनाही लोकशाहीची गरज अशी वाटते.
प्रत्यक्ष व्यवहार काही असो, गरीबांचे कल्याण हा चर्चेचा विषय आणि निवडणकांचे सातत्य हा आग्रहाचा विषय-या दोन बाबी भारतीय राजकारणात आहेत. या बाबी पुरेशा नाहीत हे खरे आहे, पण या दोन बाबी आहेत ही चांगली गोष्ट आहे असे मला वाटते.

महत्त्वाचा मुद्दा

सगळे अडचणीचे प्रश्न यापुढील विचार करताना निर्माण होतात. वर्ग-वर्ण निराकरणाचा प्रश्न सुद्धा वर नोंदवलेल्या दोन बाबींच्या पुढे जाऊन तिचा विचार करताना निर्माण होतो. आर्थिक विषमता प्रत्यक्षात दूर होवो अगर न होवो, शहरे आणि खेडी यांतील अंतर प्रत्यक्षात कमी होवो अगर न होवो, त्या भाषेत बोलत राहिले पाहिजे. निवडणकीची प्रक्रिया चालू ठेवून आपण सत्तेत येण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतकेच ज्यांना राजकारणाविषयी म्हणायचे आहे त्यांना वर्ग-वर्ण निराकरणाचा विचार करण्याची गरज नाही. ज्या मंडळींना मनांत आकारित लोकशाहीला लोकशाहीचा आत्मा देण्याची प्रेरणा आहे, ज्यांच्या समोर समाजवादी समाजरचना व्यवहारात साकार करण्याची जिद्द आहे किंवा ज्यांना लोकशाहीविषयी फारशी आस्था नाही, पण समाजवादी क्रांतिविषयी मात्र उत्कट आस्था आहे या सर्व मंडळींच्यासाठी वर्ग-वर्ण निराकरणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. एका अर्थी हा प्रश्न नवा आहे, दुसऱ्या अर्थी हा प्रश्न पुरेसा जुना आहे, स्वातंत्र्यपूर्व

।५