पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्ण आणि वर्ग हा भारतातला एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

वर्गनिराकरणाच्या प्रक्रियेच्या आड वर्ण म्हणजे जात सतत येते.

वर्गकल्पनेच्या आहारी जाऊन, समाजसुधारणा आपोआप घडून येतील असे मानणारी मंडळी होती व आहेत. पण तोही एक भ्रमच होतः असे जाणवू लागले याहे.

महात्मा गांधींनी पापल्या स्वातंत्र्य चळवळीत समाजसुधारणांचा आशय समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना गांधींचे नेतृत्वच फक्त हवे असल्याने त्यांनी त्याला तोंडदेखली मान्यता दिली, पण बहुतेक सर्वांचा कल राजकीय सत्तासंपादनाकडेच राहिला.

आजही या परिस्थितीत फारसा फरक पडल्याचे जाणवत नाही. वर्गीय जाणिवा वर्ग--जातिविषयक जाणिवांना पुरेशा जोमाने काटशह देतात असे आढळत नाही.

योग्य दृष्टी आणि डावपेचांची पाहणी असेल तर वर्ग-वर्ण निराकरणाचे संघर्ष परस्पर उच्छेदक न बनता परस्पर पूरक भूमिकाही बजावू शकतील, पण त्या दृष्टीचा आजवर प्रायः अभावच होता. आता कोठे वर्ग आणि वर्ण कल्पनेचा सखोल अभ्यास सुरू झाल्यासारखा वाटतो.

वर्ण-जातिव्यवस्था ही भारताची स्वतःची अशी खास समस्या आहे आणि त्यामुळे तिच्या निराकरणासाठी परदेशी उसनवारीचा फारसा उपयोग होण्यासारखा नाही.

मूलभूत विज्ञान हे विश्वस्पर्शी असले तरी तंत्रज्ञानाला देश-कालपात्राचे अनुसंधान राखावेच लागते. देश-काल-पात्राचे अनुसंधान राखता आले नाही, तर मूलभूत वाटणारे सिद्धांतच विवादास्पद ठरतात. भारतीय संदर्भात राजकीय व आर्थिक क्षेत्रात असेच काहीसे झाले असावे आणि त्यामुळेच लोकनायक जयप्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांतीसाठी आवाहन करावे लागले. आरंभ कुठूनही झाला तरी जीवनाच्या सर्वांगांना कवेत घेतल्यावाचून आरंभ अखेरची मजल गाठू शकत नाही.

प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या पुस्तिकेत केलेल्या विवेचनाचे या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.