पान:वनस्पतिविचार.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३ वे ].    क्षार, कार्बन् वायू व हरितवर्ण शरीरें.    १०९
-----

मुळे सूर्यप्रकाशांत कार्बन वायु शोषिला जाऊन सेंद्रिय पदार्थ तयार होणार नाहींत व शेवटी ती वनस्पति फिक्कट होऊन आपोआप मरून जाईल.

 सोडियम, मॅंंगेनीझ, आयोडीन वगैरे वस्तु जरी वनस्पतीस आवश्यक नाहीत, तरी त्या पुष्कळ वेळां वनस्पतिशरीरांत सांपडतात. तांबे, जस्त, निकेल, अॅल्युमिनियम वगैरे धातुसुद्धा वनस्पतीमध्ये आढळतात. ह्यांचे प्रमाण किंवा अस्तित्व ज्या जमिनींत ती उगवते, तिच्या घटकावयवांवर अवलंबून असते. हे पदार्थ ऑसमॉसिस क्रियेने मुळांवरील केसांतून वनस्पतींत जातात. आतां असा प्रश्न उद्भवतो की, ज्या वस्तूंची वनस्पतीस जरूरी नाही. त्या वस्तु प्रथमपासुनच कां शोषिल्या जातात ? सजीवतत्त्व आपली पसंती अथवा नापसंती, पदार्थशोषणाच वेळीं का उपयोगांत आणत नाही ? खरोखर ऑसमॉसिस क्रियेने जे पदार्थ शरीरांत शोषिले जातात, त्यांवर सजीवतत्त्व प्रथम अम्मल करीत नसते; पण पदार्थ शोषिल्यावर त्यांमध्ये जरूरीचे कोणते व निरुपयोगी कोणते ह्याची विचक्षणा होऊन जरूर नसलेल्या पदार्थांस दूर एका जागी नेऊन ठेवण्याची व्यवस्था मात्र ते करते. ही व्यवस्था करण्यांत सजीवतत्व आपली पसंती दर्शविते. शिवाय ऑसमॉसिस क्रिया सुरू होण्याचे वेळेस असल्या पदार्थांचा दुसऱ्या पदार्थाशी अतिनिकट संयोग असल्यामुळे दुसऱ्या पदार्थांबरोबर तेही शोषिले जातात, त्याप्रमाणे ऑसमॉसिस क्रिया दोन भिन्न घनतेच्या द्रवांमध्ये सृष्टिनियमाने सुरू होते; पण पाणी केंसांत शिरल्यावर आंतील सजीवतत्त्व पाण्यामुळे उत्तेजित होऊन पुढे आलेल्या पदार्थात जीवनकार्यास उपयोगी पडणारे कोणते व निरुपयोगी कोणते, हे सर्व पाहून तजवीज करते, म्हणून ऑसमॉसिस क्रिया सुरू होण्यापूर्वी सजीवतत्त्वास पसंती अगर नापसंती दाखविता येत नाहीं; येवढेच ह्यासंबंधाने तूर्त उत्तर देता येते. ह्याविषयी पूर्ण ज्ञान नाहीं हे कबूल करणे भाग आहे.

 फॉस्फरस व गंधक ह्या दोन वस्तु सजीवतत्त्वाच्या घटकावयवांत आढळतात. ह्याही वस्तु आवश्यक आहेत. सजीव पदार्थात गंधक असते. फॉस्फरस केवळ केंद्रबिंदूमध्ये ( Nucleius ) असतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन तसेच गंधक व फॉस्फरस हे पदार्थ एकमेकांशी मिसळून सजीव पदार्थ तयार होतात. सात्विक सेंद्रिय पदार्थ पहिल्या तिन्हींचेच बनतात.