पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोककथागीतं

 माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. एखादी गोष्ट रंगवून सांगणे त्याला आवडते, तसेच गोष्ट ऐकणेही त्याला आवडते. त्यामुळे पूर्वापार कित्येक वर्षांपासून अनेक लोककथा अजूनही सांगितल्या, ऐकल्या जातात.
 व्यवस्थितपणे त्या कथांकडे पाहिले तर जाणवते, त्या कथांमधून त्या काळातली लोकसंस्कृती डोकावते. खूपदा अनेक चमत्कारही अशा कथांमधून आढळतात. देवांशी संबंधितही अनेक कथा आहेत. संतांशी संबंधित अनेक कथा आहेत. पशुपक्षी, भूत सैतान हे सगळे या लोककथांमधून डोकावत असतात. कोकणामध्ये वेताळ, भुतांच्या अनेक कथा आहेत. हे गावाची कशी राखण करतात हे सांगताना कोकणातील लोकरीवाज, तिथल्या माणसांची मानसिकता, तिथली सांपत्तिक स्थिती, तिथली पिकं या सर्वाची जाणीव त्यातून होते. महानुभवांच्या वाङ्मयात, लीळा चरित्रात अशा कथांचा जुना पुरावा सापडतो. त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींनीही सांगितलेल्या अनेक गोष्टी आढळतात. मुस्लिम साहित्यातही अनेक गोष्टी आढळतात. त्या नुसत्या कथा नाहीत, तर त्यातून अनेक विचार मांडलेलेही आढळून येतात. कृष्णदेव उपाध्याय यांनी प्रेमाची अभिन्न भावना, अश्लीलतेचा अभाव, मानवी जीवनाच्या मूलभूत प्रवृत्तींशी अखंड साहचर्य, समृद्धी आणि मांगल्याची पवित्र भावना, सुख किंवा आनंद पर्यवसायी तसाच मीलनात कथेचा शेवट, रहस्यमयता, अद्भूतता आणि अलौकिकता याचे प्राबल्य, उत्कंठतेची प्रबल भावना आणि वर्णनातली स्वाभाविकता ही लोककथेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
 पण जेव्हा आपण लोककथागीतांचा विचार करतो तेव्हा त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे, हे जाणवून येतं. एखाद्या गीतातून लय-ताल साधत प्रभावी सादरीकरणातून कथा पोचवणं, खरं हे तर अवघड असते; पण जुन्या लोककथा गीतातून हे यशस्वीपणे सादर केले गेले आहे.  लोककथागीतांकडे पाहिलं की जाणवतं, त्या सर्वांमध्ये सर्वसामान्यांना लोभावणारी एक प्रकारची गेयता असते आणि तालासुरात ही कथा गुंफलेली असते. ही गीतं नक्की कोणी लिहिली त्यांची नावं कोठेच सापडत नाहीत, त्यामुळे या निर्मात्याच्या व्यक्तित्वाचा अभाव जाणवतो. सर्व लोककथागीतं बव्हंशी समहामध्ये गायिली जातात. ही लोककथागीतं परंपरेने वर्षानुवर्षे चालत आलीत त्यामुळे मौखिक परंपरेने जपली गेली आहेत. थोडेफार बदल त्यात झाले असतीलही; पण लोककथा गीतांमधला साधेपणा कुठेही उणावलेला नाही.

 खूपदा लोककथा गीतांमध्ये एकच घटना घेऊन त्यावर गीत रचलेले असते. उदा. द्रौपदीने

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ७९ ॥