पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्राम्य बोलीतील शब्दांचा वापर ओवीत प्रामुख्यानं येतो. ध्याई, भिरूड, शीनगार, सौंगड यासारखे अनेक शब्द त्या विशिष्ट प्रादेशिकतेची जाणीव करून देतात.

पाची परकारनं ताट वर कुल्लई बारीक
बहीनना घर करी जेवनना तारीफ

 यासारखी ओवी विदर्भातल्या अनेक शब्दांना घेऊन येते. 'कुल्लई' म्हणजे कुरवडी तो विदर्भाचा शब्द. अशी प्रादेशिकता ओवीतून जाणवते. प्रादेशिक शब्द, सण, परंपरा त्यातून डोकावत राहतात. प्रदेश कोणताही असला, तरी बाईचं दुःख हे सगळीकडे एकसारखं हे या सगळ्या ओव्यांतून जाणवत राहतं. या पूर्वापार परंपरा, जाणिवा जपणारी जात्यावरची ओवी हे मराठीतलं अस्सल स्त्री धन आहे. सरोजिनी बाबर, अरुणा ढेरे, शांताबाई शेळके वगैरे सारख्या लेखिकांनी हे धन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. यात सरोजिनी बाबर यांचा सिंहाचा वाटा आहे. विखरून राहिलेली ही रत्नं माणिकं त्यांनी एकत्रित केली. त्यामुळं मराठी भाषेचं एक दालन समृद्ध झालं. दिवस बदलत आहेत. आता 'जातं' हा प्रकार शहरात फारसा दिसत नाही. खेड्यात आहेत; पण त्याचं अस्तित्व आणखी किती काळ शाबीत राहील हा प्रश्नच आहे. जात्यावरची ओवी जात्याभोवती रुंजी घालत राहिली होती; पण आता ती मराठी वाङ्मयाचा एक भाग झाल्याने लिखित स्वरूपात का होईना टिकून राहिली; पण जात्याच्या साहाय्यानं ती खऱ्या अर्थी जिवंत होते हे विसरता येणार नाही. पहाटेचा प्रहर, लयीत घरघरणारं जातं आणि वातावरणात पसरणारे ओवीचे बोल हे जिवंतपण किती काळ टिकेल, याची मात्र शंका आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ३४॥