पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोकसंस्कृतीमधील दिवाळी

 दिवाळी दर वर्षाला येते. आनंदाला उधाण येतं. घरात गोडधोड होतं. अंगणात रांगोळ्या रंगतात. दिव्यांची आरास होते. मन सुखसमाधानानं चिंब होतं. खेड्यातली दिवाळी आम्ही पाहिलेली. आता खेडीही बदलायला लागलीत. शहरीकरणाचा वारा त्यांनाही लागलाय; पण अजून पूर्ण बदलली नाहीत. लोकसंस्कृतीचा एक तुकडा का होईना खेड्याच्या रूपानं जिवंत आहे. दरवर्षी दिवाळीत मला खेड्यात अशीच कोणीतरी सांगितलेली एक कथा आठवते.
 एका आटपाट नगरात एक छोटसं शेतकऱ्याचं घर. तिथं नवीन लग्न होऊन आलेली एक सून असते. घर खातं-पितं नांदत असणारं असं. आश्विन मासात एका पहाटे सासू शेतात जायला निघते. सुनेला सांगते, 'हे बघ, मी शेतावर निघाले, दुपारी येईन तोपर्यंत गहू-मूग दाणे काढ. गव्हाळं-मुगाळं शिजवून ठेव.'
 सून नवीन आलेली. तिनं गहू-मूग काढले; पण गव्हाळं- मुगाळं नावाची गाईची वासरं दारात होती. तिला वाटलं, तीच सासूनं शिजवायला सांगितलीत. तिनं तसं केलं. ती कापून शिजवली. सासू आल्यावर ते पाहून घाबरून गेली. तिचं काळीज उडून गेल्यासारखं झालं. देवासमोर जाऊन तिनं डोकं आपटीत म्हटलं, 'देवा सुनंकडून चुकलं. माझी गव्हाळी, मुगाळी वासरं जिवंत कर नाहीतर तुझ्यापुढं डोकं आपटून रक्ताचं शिंपण करीन. माझी वासरं जिवंत केलीस, तर सगळ्यांना साखर वाटीन.'
 देवानं तिचं ऐकलं. तिची गव्हाळी-मुगाळी वासरं जिवंत केली. वासरं गायांना जाऊन बिलगली. सासूनं देवाची मनसोक्त पूजा केली. गाय-वासरांना ओवाळलं.
 गाय-वासरांच्या श्रद्धेतून ही गोष्ट आली असावी. माणसांच्या भावनाशील मनात गाय-वासरांचं महत्त्व चिरंजीव झालं. वसुबारसेला सगळ्या गोठ्यात गाई-वासरांना ओवाळलं जातं. त्यांना गोड-धोड घास भरवला जातो. खेड्यातली संपन्नता काही पावलं गोठ्यातूनही येते. त्या सोनपावलांचं हे सश्रद्ध पूजन असावं.

दिन् दिन् दिवाळी
गाई-म्हशी ओवाळी
गाईचा वारा, बैल नवरा
बैल कुणाचा लक्षुमनाचा
लक्षुमन कुणाचा आई-बापाचा

 हे गाणं तरी खूप पूर्वीपासून लहान-थोरांच्या तोंडी आहे. यातल्या गाई-म्हशी ओवाळीची संगती

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १६१ ॥