उन्हाळ्याच्या दिवसात वाड्याच्या मधल्या मोठ्या चौकात आम्ही रात्री जेवणे आटोपली, की बसायचो. लहान मुलं असायची, मोठे पुरुष असायचे. वाड्यातल्या बायका, म्हाताऱ्या सगळे जमायचे आणि मग कोणीतरी म्हणायचं, 'मी हुमाण घालतो वळकून दाखवायचं?'
असं म्हटलं म्हणजे मग इतरांनाही तो आपल्याला आव्हान देतोय, असं वाटायचं. जणू ती एक प्रकारे हुशारीची परीक्षाच असायची. चातुर्य पणाला लागल्याप्रमाणे सगळे सावरून बसायचे. मग हमाण घालणाऱ्यालाही चैतन्य यायचं.
“घालू का हुमाण?"
"घाल घाल."
कोणीतरी म्हणायचं.
"ऐका तर,
पाऊस नाही, पाणी नाही, रान कसे हिरवे;
कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले.”
ते ऐकल्यावर दोन क्षण शांतता पसरायची. सगळे विचारात पडल्यासारखे व्हायचे. कोणी तरी काही सांगायचे, ते चुकायचे.
'हरला का?'
सांगणारा स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन विचारायचा! कोणाला उत्तर न आल्याने सगळे हार पत्करल्याप्रमाणे मग होकारार्थी मान हलवायचे.
"सांगू"
"हो!"
सगळ्यांचा आवाज
“साधं उत्तर आहे 'पोपट' त्याचं सगळं शरीर हिरवं असतं आणि कात चुना न खाता चोचही पान खाल्ल्यासारखी लाल रंगानं रंगलेली."
मग सगळे इतकं सोपं असून आपणाला कसं सुचलं नाही म्हणून हळहळल्यासारखे व्हायचे.
पण ज्याच्याकडून हार खाल्ली, त्यालाही दुसरं हुमाण घालून हरविल्याशिवाय इतरांना गप्प राहवणार तरी कसं. आमच्यातल्याच एक पंच्याहत्तरीच्या आजीबाई अशी कोडी म्हणजेच हुमाण घालण्यात तरबेज.