पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अज्ञानामुळे माझी ज्ञानदृष्टी हरवली आहे. माझ्या मनात अहंकार उत्पन्न झाल्यामुळे आत्मदृष्टी हरवली. चांगला-वाईटाचा भेद करता येईना. आता यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूकडे प्रेमभक्तीवस्त्र पसरतो आहे. जेणेकरून सद्गुरू ज्ञानाची काठी मला प्रदान करेल. माझी अज्ञानदृष्टी संपून ज्ञानदृष्टी मला लाभेल.
 समर्थांना समाजातील बऱ्यावाईट घटनांची जाणीव आहे. वाईट प्रथांवर ते भारुडाच्या माध्यमातून प्रहार करतात. पूर्वी बिजवराशी लग्न लावण्याची प्रथा होती. समर्थांच्या दृष्टीने ती समाजातील वाईट प्रथाच होती.

या जोशाचे तळपट झाले।
पेर बिजवरा दिधले।
प्रथम वर म्हणोनिया।
लटिके आम्हा चाळविले

 समर्थ त्यांच्या खेळियात म्हणतात.

खेळिया नवल कैसे झाले रे।
आपणासी आपण व्याले रे।
बाप ना माय ओगेचि होये
कर्णकुमारी पाहे रे॥

 परमात्माच प्रसवला आणि विश्वाची निर्मिती झाली. परमेश्वराला विश्वरूप आपण मानतो म्हणून आपणासी आपण व्याले रे, अशी शब्दरचना समर्थांनी केली असावी.
 समर्थांचे अनुभवविश्व व्यापक आहे, याची जाणीव त्यांच्या भारुडांमधील विषयातून होतेच; पण भावही रोखठोक प्रगल्भ आहे हेही जाणवते. प्रपंचाबरोबर परमार्थ साधण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे वर्तन कसे असायला पाहिजे, त्याबद्दल समर्थांनी रूपकाचा वापर करून भारुडातून लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
 एकंदरीत भारुडे ऐकली, वाचली, पाहिली की, जाणवते भारुडांमध्ये नाट्य, अभिनय, नृत्य, संगीत यांचा विलक्षण मेळ आहे. हे सर्व साधून आले, की भारूड रंगते. भारुडात संवादाला तितकेच महत्त्व आहे त्यामुळे आशय अधिक उठावदार व स्पष्ट तर होतोच; पण परिणामकारकताही साधली जाते. एखादा माणूस बाईप्रमाणे लुगडे नेसून येतो. डोक्यावर हात मारून घेत बसतो. तेवढ्यात दुसरा कोणी येऊन विचारतो,
 'काय झालं गं डोक्यावर हात मारून घ्यायला'

 'आता काय कमी त्रास हाय का?'

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०६॥