पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७५

 सगळे लोक आपले ठिकाणी शहाणे म्हणवितात; परंतु यांस इंजिनियर इंग्रज पाहिजेत, प्रोफेसर इंग्रज पाहिजेत. डॉक्टर इंग्रजच पाहिजेत, जड्ज (जज्ज) व बारिस्टर तेच पाहिजेत, सर्व कारखाने त्यांचेच हाती. आमचे लोक त्यांचे दास्यत्व करण्यास देखील योग्य नाहीत. हे काय ? पाचशे वर्षे मुसलमानांची गुलामगिरी केली व आता शंभर-दीडशे वर्षे इंग्रजांची गुलामगिरी करतात, परंतु अद्यापि आमचे लोकांस काही ठाऊक झाले नाही.
 तथापि इंग्रजांनी आपली विद्या प्रगट केली, हा त्यांचा मोठा उपकार आहे. व येणे करून लोक शहाणे होतील. हिंदू लोक इतके मूर्ख आहेत की, इराण, तुर्कस्तान व अरबस्तान येथून मुसलमान लोक हिंदुस्थानात येऊन घरे बांधून राहिले, परंतु हिंदू लोकांस त्यांचे काही वर्तमान ठाऊक नाही व हिंदू दुसरे एखादे मुलखात गेले आहेत, असे कधी आढळणार नाही. परमुलखाचे लोक येऊन हिंदू लोकांचे हातचे हिसकावून घेऊन खातात व मानेवर जोखड ठेवून राज्य करतात; पण इतके सर्व सहन करून आहेत. यांच्या मध्ये बळ, शूरत्व किवा शक्ती कमी आहे असे नाही; पहिल्याने याणीं सर्व हिंदुस्थान जिंकले होते; परंतु यांस राखावयाचे शहाणपण नाही; याजमुळे हे गमावून बसले.
 शास्त्रात अटक, गंड व पापनाशी इतक्या नद्यांविषयी असे लिहिले आहे की, पापनाशी नदीस स्पर्श करू नये; गंडकीत चालू नये; व अटक नदी उतरून पलीकडे जाऊ नये व याचा हेतू इतकाच दिसतो की, त्या नद्या अवघड व जरा भयंकर आहेत. याजमुळे कोणी धीर करून त्यात जाईल आणि मरेल तर ते न व्हावे. यास्तव त्याणी हे शास्त्रार्थ लिहिले; परंतु दुसरे मुलखात जाऊ नये, असा त्याचा अर्थ नसेल असे वाटते. आणि जर कदाचित असला, तर ती शास्त्राज्ञा मानण्याची काही जरूर नाही. ज्या वेळेस ते शास्त्र झाले, त्या वेळेस दुसरे लोक इकडे आले नव्हते, याजमुळे ते शास्त्र योग्य, पण आताचे अवस्थेत ते मानून मूर्खाप्रमाणे उगेच बसणे, याचे कारण काय ?
 जेव्हा ही मते मोडून हिंदू लोक परदेशात जाण्यास सिद्ध होऊन मूर्खपणाचे कायद्यातून खुले होतील, तेव्हाच त्यांचे हातून काही पराक्रम होईल. युगपरत्वे करून शास्त्रही फिरले, असे समजले पाहिजे. आणि सर्व शास्त्रांचा मतलब हाच की, धर्म रक्षावा. सिंधू नदीपलीकडे जाऊ नये, हे कशाकरिता ? धर्म रक्षावा आणि म्लेंच्छांचा स्पर्श होऊ नये म्हणून; परंतु म्लेंच्छच इकडे आले, तेव्हा आपण पलीकडे जाण्याचे कामी शास्त्र एकीकडे ठेवले, तरी चिंता नाही, असे मला वाटते.

♦ ♦