पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भोपाळची शोकान्तिका तर आजही अस्वस्थ करते. गॅस घटनेत मृत्यू पावलेल्या २००० विधवा, एकाकी महिलांना शिलाईकाम पुरवणारे केंद्र शासनाने अशात बंद केले. रझियांबीचा सांगताना गळा दाटतो पण डोळ्यातून संघर्षाच्या ठिणग्या चेतत असतात. या कहाण्या होत्या, 'कातरवाऱ्याची वेळ' या सत्रातल्या.
 चौथे सत्र 'भूमी'चे. 'सीतावेळ' म्हणायचे का? झारखंडातल्या आदिवासी स्त्रियांचे प्रश्न म्हणजे 'विकासा'च्या कृतीतून निर्माण झालेल्या समस्या. बिहार म्हणजे दारिद्रयाचे भयानक दर्शन. बिहारमधून अनेक कार्यकर्त्या आल्या होत्या. विकासाची मांडणी करताना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार केलाच गेला नाही. त्यातून भरडले गेले दोन गट. स्त्रिया आणि मूले त्यांचे माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व लक्षात घेतले नाही. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांचे प्रश्न मांडले गेले.
 दुपारी विविध क्षेत्रात झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे नाव होते 'ज्ञानवेळ' गडवालच्या चिपको आंदोलनाच्या वंदना शिवांनी स्त्री आणि पर्यावरण यांतील घट्ट अनुबंध उकलून दाखवला. हाँगकाँगच्या मायाम बिलेवानी आशियातील स्थलांतरित महिलांचे प्रश्न मांडले. मलेशियाच्या इव्लेलिन हॉगने, मोठमोठी धरणे बांधल्यामुळे आदिवासी, परिसरातील लोक, जंगल, प्राणी यांच्या जीवनावर होणाऱ्या आघातांचे चित्र रेखाटले. शेवटी हे सारे ऐकताना काष्ठवत् झालेल्या ज्यूरींच्या प्रतिक्रिया. कृष्णा अय्यरांनी बजावले, "पुरुषी आश्वासनांवर कणभरही विश्वास ठेवू नका. संघटित व्हा (हुंडाबंदी कायदा मृत झाला आहे. पण हुंडा मात्र जिवंत आहे. हुंडाबळींची संख्या वाढते आहे.) स्त्रियांनो, समाजाला हलवा... थोड्या अतिरेकी झालात तरी चालेल. ही प्रचंड धरणे कोणासाठी बांधायची? कंत्राटदारांसाठी? न्याय म्हणजे काय? अन्यायाला कायदेशीर करणे म्हणजे न्याय? आम्ही पुरुषांनी आता स्त्रियांच्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी... त्यांच्या प्रश्नासाठी बरोबरीने लढले पाहिजे त्या पुढ्यात रहातील आम्ही त्यांना अनुसरु. संपूर्ण आशियाने एकत्र येऊन आपल्या विकासाची विनाशकारी दिशा बदलण्यासाठी संघर्ष दिला पाहिजे.
 ट्यूनिशियाच्या खालिदा शेरीफ आपल्या कणखर आवाजात बजावत होत्या. विकास केवळ आर्थिक बाबींशी निगडित नसतो. विकासाच्या कल्पनेतून आम्हा स्त्रियांना आणि आमच्या भावी पिढीला... मुलांना वगळले आहे. मुलांच्या विकासाच्या कल्पनेचे स्वप्न पाहणारे... त्यासाठी कष्टणारे 'बाप' आज हरवले आहेत. आपण 'विकासा'च्या कल्पनेला माणूस केंद्री बनवूया. इंदिरा जयसिंगाकडून भोपाळ गॅस प्रकरणातील निवेदन ऐकण्याची इच्छा सर्वांनी प्रदर्शित केली. त्या त्यावर बोलल्या.

रुणझुणत्या पाखरा / ५३