मीरेला वाटलं होत की 'धीरज का घागरा' नि 'सच की ओढणी' पहेनल्यावर तरी तो देश,.. जिथे स्त्रीच्या भावना, वेदना 'माणूस' या नात्याने जाणल्या जातील, तो सापडेल. पण..!! आज अनेकजणी माणुसकीहीन परंपरा, स्त्रियांना पायदळी तुडवणारे रीतीरिवाज, अंधश्रद्धा यांनी रचलेले उंच उंच गड उतरून जमिनीवर पाय ठेवीत आहेत. पायात रूतणारे काटे काढून नव्या वाटा धांडोळत आहेत.
...मार्च आला की महिला दिनाच्या निमित्ताने भंवरीबाई आठवतेच. मध्यतरी कोलकत्याला महिलांचा राष्ट्रीय पातळीवरचा मेळावा झाला होता तिथे भंवरी आली होती. मी भंवरीची आठवण काढताच सुनिताने लगेच माहिती दिली.
"भाभी, भंवरी कोलकत्याला भेटली होती. तिने साथिन् ची संघटना बांधली आहे. तिचा पोषाख, तो घागरा... डोळ्यातली चमक, माथ्यावरचे बोर, ओढणी अगदी आहे तसेच आहे..."
अशावेळी मन उद्याच्या आशांनी लखलखून जाते. ओठावर ओळी येतात
माझ्या कातडीचे लिलाव
चौरस्त्यात मांडलेस
वयाचे हिशेब मांडित.
आणि तरीही
सात जन्मांचे वायदे स्मरून
तुझ्याच अंगणात बहरले
तुळस होऊन.
व्यास महर्षीची
आर्द्र हाक
जागी होतेय मनात.
हे भाविनी, हे अग्निकन्ये, हे मनस्विनी !!!
आणि दगडी वृंदावनाचे चिरे फोडून
पुन्हा एकदा जन्माला येतेय
भूमीकन्या सीता
नवे रामायण लिहिण्यासाठी...
□
६/रुणझुणत्या पाखरा