पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  भंवरीबाई त्यावेळी वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून केवळ भारतभरच नव्हे तर भारताबाहेर जाऊन पोचली होती. भंवरीबाई जयपूर परिसरातली. एक हुशार आणि धाडसी, शिक्षण नसलेली कुंभारीण. चाकोरीतलं अ..आ..ई.., १,२,३ असं शिक्षण नसले तरी सामान्य व्यक्तीजवळ नव्या उजळत्या प्रकाशाची किरणे हवेतून सर्वांपर्यंत पोचतातच. भोवतालच्या गप्पा, चर्चा, बातम्या यांतून अडाणी मानली जाणारी व्यक्तीपण खूप काही शिकते. महिलांच्या सर्वांगीण विकासाचे काम १९७५ पासून जागतिक पातळीवर सुरू झाले. १९८४-८५ पासून त्याला वेग आला. काम तळागाळापासून सुरू केले तर ते सर्वांपर्यंत पसरते याचे भान शासनाला आले. राजस्थानात शासनाने 'साथिन' हे पद ग्रामीण परिसरातील महिलांच्यात सर्वांगीण महिला विकास व्हावा या हेतूने निर्माण केले. भंवरी जयपूर जवळच्या खेड्यात साथिन म्हणून काम करू लागली. घरोघरी जाऊन मुलींना शाळेत घालण्यासाठी आई, आजीशी संवाद करीत असे. मुलगी वयात आली, की नैसर्गिक बदल होतात. पण ती लग्नाला योग्य होत नाही. आपण मातीची कुंडी बनवतो तिला आकार देतो. पण ती सर्वांगानी भाजल्या शिवाय परिपूर्ण बनत नाही. तिच्यात माती, पाणी घालून रोप लावता येत नाही. ती कच्ची राहिली तर कुंडीच मोडून विरघळून जाते. पोर तेरा चौदाची असेल नि बापानी लगिन लावले तर गर्भाशयात बीज रूजत नाही. अपकार होतात. त्यात मुलीची शक्ती जाते. तिला वेगवेगळे आजार होतात. पोरीला शिकवा. असे ती सांगे. बाईला मारहाण करू नका, दारू पिऊ नका सांगे. महिलांची मंडळे तिने तयार केली.
४/रुणझुणत्या पाखरा