पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९६८-७२ च्या काळातले दिवस. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात मी नव्यानेच रुजू झाले होते. मी मराठी वाङ्मयाचे समीक्षक आणि चिकित्सक समीक्षेचे अभ्यासक वा. ल. कुलकर्णी, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. पानतावणेसर यांचे तास... प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य, वा. ल. कुलकर्णीच्या सहृदयतेमुळे अडीच तीन महिने मला लाभले. लेखनाची आवड शाळेपासून होतीच. पण अर्थशास्त्र हा विषय इंग्रजीमधून घेऊन बहिस्थ विद्यार्थी म्हणून मार्गदर्शन मिळणे अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात शक्य नव्हते. अशावेळी माहेरी गेले असतांना माझ्या लेखनावर प्रेम करणारे प्रा. म. वि. फाटक यांनी मला बजावले "चुकलेलं कोकरु परत कळपात येऊ दे. मराठी विषयात एम. ए. कर. वा. लं. ना माझे नाव सांग." मग गाडी वळणावर आली १९६६ ला प्रथमवर्गात उत्तीर्ण झालेलो आम्ही तिघेच. आणि मी एकटी बहिस्थ. १९६८ च्या दिवाळी नंतर महाविद्यालयात शिकविण्याची संधी मिळाली. भरून आणलेले आषाढ धन. वर्षावायला आसुसलेले. तशीच मी. अवघे ज्ञान, अनुभवांना सोप्या शब्दात विद्यार्थ्यांवर बरसण्याची उमेद. वयही तरुणाईचं. आणि समोर अत्यन्त उत्सुक विद्यार्थी. भास्कर चंदनशिव, रामा मुळे सारखे. तेव्हा मराठी घेणारे विद्यार्थी बरेच असत. व्यावसायिक दृष्टिकोनातून भाषा विषयांकडे पाहण्याची नजर विद्यार्थ्यांच्यात आली नव्हती. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या विषयांना अनेक विद्यार्थी असत ते नियमित आणि मनाची ओंजळ जुळवून येत.

रुणझुणत्या पाखरा / १३७