पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिषद भरली होती. त्या परिषदला रझिया पटेल उपस्थित होत्या. त्या परिषदेचा जो अहवाल रझिया पटेल यांनी सादर केला आहे तो अत्यंत आशादायक आहे. "The International Solidarity, Network of Women Living Under Muslim Laws" यांच्या वतीने मुस्लिम स्त्रियांच्या लेखांचे Dossiers प्रसिद्ध होत असते. डेल आयकेलमन यांचे 'The Coming Tranformation in the Muslim World' तसेच दिलीप पाडगावकर यांनी १५/३/१९९३ रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेला आणि ९/१०/१९९६ रोजी 'आऊटलुक' मध्ये सागरिका घोष यांनी लिहिलेला लेख यांवरून हमीद दलवाई यांच्याप्रमाणेच अनेक मंडळी आपापल्या देशात उदारमतवादी प्रभाव वाढावा म्हणून प्रयत्नशील आहेत असे दिसते. त्यांतील कित्येक आजही तुरुंगात आहेत. सर्वजण सर्व मुद्यांवर हमीद दलवाई यांच्याबरोबर सहमत झाले असतेच असे म्हणण्याचे कारण नाही. परंतु हा उदारमतवादी प्रवाह सर्वत्र जिवंत आहे ही गोष्ट मोलाची मानली पाहिजे. नेदरलँडच्या संसदसदस्या औसाना चेरीवी, इराणच्या प्रो. फरीबा अडेहका, 'द बुक अॅन्ड द कुराण' लिहिणारे सीरियाचे मोहम्मद शहरूर, सीरियाचे धर्मनिरपेक्ष विचारवंत सादिक जलाल अल् अझम, तुर्कस्तानच्या फतुल्लाह गुलेन, इराणचे अब्दोल करीमसोरौश, पाकिस्तानचे नझीर अहमद, इजिप्तचे नोबेल पारितोषिक विजेते नगीब महफूज, इजिप्तच्या कादंबरीकार नावल एल् सादवी, व्यंजनकार फुराग फौउदा, कादंबरीकार अल् हमीद, पाकिस्तानचे अख्तर हमीद खान, इराणची लेखिका मरियम फिराैज, कुवेतचे पत्रकार फौद अल् हशेम, पटन्याचे प्रो. ए. आर. बेदर, सौदी अरेबियाचे अ. रहमान मुनीफ, बांगलादेशचे दाऊद हैदर व तस्लीमा नसरीन, पाकिस्तानच्या रिफात हसन, इंग्लंडचे सलमान रश्दी इत्यादी अनेक लोक मुस्लिम समाजात उदारमतवाद रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातही सदा-ए-निसवाँ, बोहरा सुधारणावादी, तरक्की पसंद मुस्लेमीन, मुस्लिम मराठी साहित्य परिषद, प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अशा अनेक संघटना कार्यरत आहेत. हमीद दलवाई संपले असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या मागे गेले पाव शतक मुस्लिम सत्यशोधक मंडळ व हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट काम करीत आहे, ही सामान्य गोष्ट नाही.

 हमीद दलवाई यांच्या पुस्तकाच्या वाचकांना माझी अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी हमीद दलवाई यांचे विचार व तळमळ नीट समजून घ्यावी. विश्व हिंदू परिषदेचे लोक अयोध्येचा प्रश्न उपस्थित करून जसे हिंदू मनाला भडकावीत आहेत तसे मुस्लिम समाजाने करू नये. पैगंबरसाहेबांचा विवाह, विविध युद्धे, करार इत्यादी अनेक मुद्यांबाबत हमीद दलवाई यांनी जरूर लिहिले आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना पैगंबरसाहेबांचे कर्तृत्व मान्य नव्हते. उलट त्यांच्या कर्तृत्वाबद्दल हमीद दलवाईंच्या लेखनात गौरवपूर्ण उल्लेख आहेत. तथापि कराण असो, हदीस असो अगर पैगंबर साहेबांचे जीवन असो, त्याबद्दलही उलटसुलट चर्चा करण्याची उदारता मुस्लिम समाजात निर्माण होवो, असे हमीद दलवाई यांना वाटते. अशा आत्मटीकेच्या प्रथेमुळेच ख्रिश्चन व हिंदू धर्मीयांत प्रबोधनाचे प्रवाह निर्माण होऊ शकले. तसा प्रवाह मुस्लिम समाजामध्ये निर्माण व्हावा यासाठी तर हमीद दलवाई यांनी

१६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान