पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरीत असताना 'त्रिदंडी संन्यास' हा काळाशी सांधाही समजून घेतला पाहिजे. खाडिलकरांची नाट्यप्रकृती गंभीर, अंतर्मुख अशी नव्हती, तर ती बहिर्मुख खणखणाटाकडे आकर्षित होणारी अगर नाट्याभ्यासात रमणारी होती. मराठी रंगभूमीवर खाडिलकर 'भाऊबंदकी' आणि 'कीचकवध' यामुळे गाजले नाहीत. त्यांचे यश 'स्वयंवर' व 'मानापमान' यामुळे कळसाला पोचले. बालगंधर्वांनंतर 'स्वयंवर' मागे पडले आणि खाडिलकरांचे अमर नाटक हा मान शेवटी 'मानापमानाला मिळाला. १९२६ नंतर म्हणजे 'कीचकवधा' वरील बंदी उठवल्यानंतरसुद्धा ते नाटक फारसे रंगू शकले नाही. 'शारदा' मागे पडले आणि 'संशयकल्लोळ' अमर झाला. 'भाऊबंदकी', 'कीचकवध' मागे पडले आणि 'मानापमान' अमर ठरले. त्यांच्या जोडीला गंभीर नाटक फक्त 'एकच प्याला' हेच एक होते; मराठी रंगभूमी कोसळेपर्यंत टिकून होते.

माझी तक्रार
  खाडिलकरांच्या नाटकाचे सामान्य विवेचन करताना वर मी जी मते नोंदविली आहेत ती एकेका नाटकाचे विवेचन करताना वा. ल. कुलकर्णी यांनी नोंदविली होतीच. फक्त प्रत्येक नाटकाचे रसग्रहण करताना ज्या प्रतिक्रिया त्यांनी नोंदविल्या त्यांच्याशी एकरूप असणारे खाडिलकरांचे सामान्य विवेचन त्यांनी केले नाही ही माझी तक्रार आहे. खाडिलकरांच्या नाट्यलेखनाला 'सवाई माधवराव यांचा मृत्यू' येथून आरंभ होतो आणि त्यांच्या नाट्याचे यश 'कीचक वध' मध्ये कळसाला जाऊन पोचते. यानंतर गंभीर नाट्य लिहिण्यात स्वयंवरापर्यंत फारसे यश खाडिलकरांना आले नाही आणि वेगळ्या प्रकृतीच्या नाटकात मानापमानानंतर ते यश पुन्हा खाडिलकरांना आले नाही. या घटनेचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे टिळक हयात असतानाच १९१६ सालापासून खाडिलकरांची नाट्यप्रतिमा उतारात पडली. किंबहुना ‘स्वयंवर' हा एक योगायोग म्हटला तर १९०७ ('कीचकवध), १९१२ ('मानापमान) आणि १९१६ ('स्वयंवर) या तीन वेळीच खाडिलकरांचे नाटक बांधेसूद होऊ शकते. लोकमान्य टिळक नजरेआड झाले आणि खाडिलकरांच्या नाट्यसृष्टीचा धृवतारा कोसळून पडला हे विधान तारतम्यानेच घेतले पाहिजे. कारण टिळक असतानाच त्यांची नाट्यसृष्टी कलू लागलेली होती.

नाटककार खाडिलकर/७१