पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाणांमध्ये विट नेहमी स्वतःच्या जीवनाची कथा सांगत असतो. आपण गेल्या रात्री कोणते सुखविलास कुणाबरोबर भोगले याचे तो तपशिलाने वर्णन करीत असतो. म्हणजे या भाणांची कथा विटाची स्वतःची कथा असते. प्राचीन भाण दीर्घकालपर्यंत उपलब्ध नव्हते आणि उत्तरकालीन भाण सांकेतिक व कंटाळवाणे होते. त्यामुळे आधुनिक विद्वानांचे लक्ष दीर्घकाळपर्यंत या वाङ्मयप्रकाराकडे जाऊ शकलेच नाही. इ. स. १९२२ साली एम. रामकृष्ण कवी यांनी गायकवाड प्राच्यमालेत 'चतुर्भाणी' या नावाने चार भाण प्रकाशित केले. हे भाण गुप्त-संस्कृतीच्या काळातील म्हणजे पाचव्या-सहाव्या शतकांतील आहेत, असा निर्णय संशोधकांनी दिलेला आहे. हे कै. कवींना उपलब्ध झालेले जे चार भाण, ते प्राचीन भाण म्हणून ओळखले जातात. संस्कृत वाङ्मयाच्या क्षेत्रात या भाणांची उपलब्धी हा एक सखद असा प्रकार मानला जातो.
  या चारही भाणांत विट हे एकच पात्र असले, तरी ते स्वतःची कहाणी न सांगता नायक-नायिकांची कहाणी सांगत असते. या भाणांचे स्थळ पाटलीपुत्र किंवा उज्जैनमधील गणिकांची वस्ती हे आहे. उपहास, उपरोध, अतिशय जिवंत अशी संस्कृत भाषा, विनोद आणि शृंगार हे या प्राचीन भाणांचे वैशिष्ट्य आहे. भाण समजून घ्यायचा असेल तर तो ज्या वातावरणात निर्माण होतो, त्याची काही प्रमाणात कल्पना असावी लागते.
 गणिकांची वस्ती हे भाणाचे स्थळ असते. भाणामध्ये जी नायिका असते ती गणिका असते आणि नायक असतो तो व्यापारी अगर सरदारपत्र असतो. त्याला ही गणिका भोगविलासासाठी हवी असते. ही घटनाच या वेशवस्तीत प्रेम, विरह अशा पद्धतीने सांगितलेली असते. वेश हा सर्व खोटेपणांचा व बदमाषीचा अड्डा असतो. येथील प्रेम, कलह, एकनिष्ठा साऱ्याच बाबी खोट्या असतात. कारण सधन गिहाइकावर रुसणे गणिकांना परवडणारे नसते. रुसावयाचे ते मनधरणी व्हावी म्हणून आणि तो योग जमला नाही तर आपण होऊन नायकाकडे जायचे. त्याला अभिसार असे म्हणतात. प्रेमरंजन आणि भोग ही बाजू गणिकेने सांभाळायची. ती प्रेमात पडल्याचा, विरहाचा अभिनय करीत असते. नायकही विरहाच्या बाबी बोलत असतोच. या दर्शनी व्यवहारामागे असणारा धंदा, पैसा, व्यवहार ही बाजू गणिकांच्या माता पाहतात. त्याखेरीज विटांची त्यांना साथ असते. व्यवहारात विट गणिकांना गिहाइके आणि गिहाइकांना गणिका गाठून

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २३७