पान:युगान्त (Yugant).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ५३

नका,' अशा सूचनाच आहेत. ह्या बाईचे हृदयदेखील 'वज्रायसा'चे ( पोलादाचे) होते, ह्यात शंका नाही.
 तिच्या ह्या शब्दांपेक्षाही कठीण शब्दांत कर्णाने तिला फटकारले. तिचा धिक्कार केला. कर्णाकडे ती गेली नसती, तरी चालते. पण दुर्योधनाचा डाव हाणून पाडून, फार दिवस सोसलेल्या अन्यायाचे व दुःखाचे तिला परिमार्जन करायचे होते, म्हणून लाचारी तिने पत्करली. एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे ती कर्णाकडे गेली. स्वतःचा एक विशिष्ट हेतू साधणे एवढाच तिचा उद्देश होता का? कर्ण कोण, हे सांगून तिने 'पाच भावांत सहावा हो. लढाई खेळू नकोस. तुझे सूतपुत्रत्व जाऊन तू 'क्षत्रिय' पदवीला पोहोचशील,' असे आमिष दाखवले.
 कर्णाचे उत्तर चाबकाच्या फटकाऱ्यापेक्षाही तीव्र आहे. पहिल्या सलामीला तो 'क्षत्रिये' हे उपरोधाने भरलेले संबोधन योजतो. 'क्षत्रिये, तू म्हणतेस त्यावर माझा विश्वास आहे. माझे यश व किर्ती ह्यांचा सर्वस्वी नाश करायचे पाप आपण केलेत. क्षत्रिय म्हणून जन्मून क्षत्रियाचे संस्कार माझ्या जन्मानंतर झाले नाहीत. ह्यापेक्षा माझे जास्ती वाईट माझा कोण शत्रू करू शकणार आहे ? त्या वेळी माझ्याबद्दल करुणा दाखवली नाहीस, आणि आता मला आव्हान देते आहेस ? त्या वेळी आईप्रमाणे वागली नाहीस, आता आली आहेस, ती केवळ आप्पलपोटेपणामुळे. पूर्वी कधी मला कोणी भाऊ माहीत नव्हता, आता एकदम तो उपटला, तर लोक मला काय म्हणतील? ज्यांनी मला इहलोकातले सर्व दिले, त्या धृतराष्ट्रपुत्रांना मी आता सोडणे शक्य आहे का ? एवढे मात्र तुला सांगतो की, तुला पाचच्या-पाच मुलगे राहतील. मी मेलो, तर पाच आहेतच; नाही तर मी अर्जुनाला मारून पाच राहतील. "
 कुंती दुःखाने त्याला म्हणाली, "बाबा, कौरव सर्व नष्ट होतील. तू म्हणतोस, तसे होऊ दे. दैवापुढे काय इलाज ?"
 ह्या शब्दांवरून एकदा असे वाटते की, कौरवांच्याबरोबर