पान:युगान्त (Yugant).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / पंधरा

नावाचे काव्य, असा तर्क आहे. पाच शिष्यांना कथा सांगितली, तिची प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे व कलाप्रमाणे मांडणी केली. जैमिनीने दुर्योधनाच्या बाजूने लिहिले असावे, असा तर्क आहे. (आश्वमेधिक-पर्वातील प्रो. करमरकरांची प्रस्तावना पहावी.) तिघांनी लिहिली असल्यास आज त्यातील काहीच उपलब्ध नाही. आपल्यापुढे जी कथा आहे, ती वैशंपायनाने अर्जुनाच्या पणतवाला

( जनमेजयाला ) जी सांगितली, तिची वाढवलेली आवृत्ती आहे. कारण ही कथा उग्रश्रवा लोमहर्षणीने नैमिषारण्यात कुलपती शौनकाला जी सांगितली, ती आहे, व्यासभारत, वैशंपायन - भारत, लोमहर्षणीने वैशंपायनाचे म्हणून सांगितलेले ते मूळ महाभारत, अशा पायऱ्या कल्पिल्या आहेत. ह्या मूळ महाभारताची एक पायरी उत्तरेकडच्या सध्याच्या पोथ्यांच्या मुळाशी व दुसरी दक्षिणेकडच्या पोथ्यांच्या मुळांशी. उत्तरेकडील मुळातून वायव्येकडील एक आवृत्ती निघाली. (ह्याला सुखटणकरांनी 'न्यू ν' हे ग्रीक अक्षर घातले आहे,) तीपासून शारदा व देवनागरी ह्या लिप्यांत लिहिलेल्या पण शारदेवर आधारलेल्या पोथ्या निघाल्या. गंगेच्या खोऱ्यासाठी (- 'गामा γ' हे ग्रीक अक्षर - ) एक version होते. त्यातून