पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७३०
 


चिंताजनक
 टिळकांच्या मृत्यूनंतरचा विचार अखिल भारतीय पातळीवरून केलेला आहे. त्यातून महाराष्ट्रापुरते पहावयाचे तर असे दिसते की स्वातंत्र्यलढ्यात जरी महाराष्ट्रीय जनता सहभागी झाली होती तरी टिळकांच्या नंतर त्यांच्या तोडीचा किंवा नेहरू, पटेल, सुभाषचंद्र यांच्या तोडीचा एकही नेता महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. ही संस्कृतीच्या दृष्टीने पीछेहाटच आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद येथे स्वातंत्र्यलढ्यात शमला असला तरी स्वातंत्र्यानंतर पुन्हा तो जवळ जवळ पहिल्या रूपातच दिसत आहे. शिक्षणाचा येथे प्रसार झाला असला तरी सामान्य जनता प्रबुद्ध झाली आहे असे म्हणता येत नाही. आणि मध्यमवर्गातही स्वातंत्र्यलढ्याच्या वेळचे तेज राहिलेले नाही. वास्तविक स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यलढ्याच्या दसपट कार्य शिल्लक पडलेले होतं. लोकजागृती, लोकसंघटना, लोकशिक्षण, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, शेती, उद्योग यांची पुनर्घटना इ. शेकडो कामे सुशिक्षित मध्यम वर्गाची वाट पाहात होती. तरुणांनी ग्रॅज्युएट रामदासी होऊन खेड्यात जावे असे टिळक सांगत असत. महात्माजींचा विधायक कार्यक्रम यासाठीच होता. पण स्वातंत्र्यानंतर यातले काहीच घडले नाही. काही वर्ग सत्ताप्राप्तीच्या मागे लागले आणि काही सुखासीन झाले. इत्यर्थ असा की सर्व समाजाची, सर्व महाराष्ट्राची चिंता करणारा असा कोणताही वर्ग महाराष्ट्रात नाही. त्यामुळे त्याचे भवितव्य चिंताजनकच आहे.