पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३७.
आर्थिक साम्राज्यशाही
 



रक्तशोष
 धार्मिक क्रांती व समाजपरिवर्तन यांचा गेल्या दोन प्रकरणांत विचार केला. आता ब्रिटिश कालातील अर्थव्यवस्थेचा विचार करावयाचा. ही अर्थव्यवस्था कशी होती हे 'आर्थिक साम्राज्यशाही' हे जे प्रकरणाला नाव दिले आहे त्यावरूनच कळून येईल. ब्रिटिशांचे येथे राजकीय साम्राज्य तर होतेच, पण त्यापेक्षाही जास्त विघातक असे आर्थिक साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केले होते. हरएक मार्गाने येथल्या प्रजेची लूट करून भारताचा रक्तशोष त्यांनी चालविला होता. धर्म, समाजकरण आणि राजकारण ही सर्व अंगे अविभाज्य आहेत, असे मागे वारंवार सांगितलेच आहे. अर्थकारणाच्या बाबतीत ते दसपट खरे आहे. येथल्या धनाची नानाप्रकारे लूट करून ब्रिटिशांनी भारताचे शोषण कसे चालविले आहे, याचे सशास्त्र विवेचन राष्ट्रपितामह दादाभाई नौरोजी यांनी केले. पन्नास वर्षे या विषयाचे सतत मनन, चिंतन, अभ्यास, लेखन, प्रवचन केल्यानंतर त्यांनी स्वराज्यावाचून हा रक्तशोष थांबावयाचा नाही, असा सिद्धांत १९०६ सालच्या काँग्रेसपुढे मांडला. ही दोन अंगे किती अभिन्न आहेत ते यावरून कळून येईल.