पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६९२
 


रत्नागिरी
 अस्पृश्यतेच्या बाबतीत, रत्नागिरी जिल्ह्यात, ते नुसते तत्त्वज्ञान सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष मोठे परिवर्तन घडवून आणले. १९२५ साली स्थानबद्धतेत असताना त्यांनी तेथे प्रथम लोकांचे मतपरिवर्तन घडवून आणले. त्या वेळी सवर्ण समाज तेथे महाराच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानीत असे. अशी स्थिती असताना सावरकरांच्या उपदेशामुळे स्पृश्य लोक महारवाड्यात भजनकीर्तनास जाऊ लागले. नंतर क्रमाने अस्पृश्य हे स्पृश्य वस्तीत भजन कीर्तनास येऊ लागले. पुढे शाळांतून मुले सरमिसळ बसू लागली आणि २-४ वर्षांत स्पृश्यांच्या घरात दसऱ्याचे सोने देण्यासाठी, हळदीकुंकवासाठी अस्पृश्यांचा प्रवेश होऊ लागला. पुढे सहभोजनेही होऊ लागली. याच सुमारास श्री. कीर या धनिकाने पतितपावन हे मंदिर बांधले व तेथे स्पृश्य एकत्र उत्सवसमारंभ करू लागले. सावरकर पुढे मुक्त झाल्यावर मुंबईस गेले. आणि हिंदुमहासभेच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले. पण त्याला प्राधान्याने राजकीय स्वरूप आल्यामुळे रत्नागिरीचे कार्य इतरत्र कोठे झाले नाही. हिंदुमहासभेने अखिल भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे कार्य चालविले असते तर हिंदुसमाज तिचा कायमचा ऋणी झाला असता.

संकरमहत्त्व
 वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता यांवर मुळीच विश्वास नसल्यामुळे आगरकरांप्रमाणेच सावरकरांनीही वर्णसंकराचा पुरस्कार केला आहे. व्यासांचे उदाहरण देऊन 'संकरः स्वर्गायैव' असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. पराशर हा ब्राम्हण व सत्यवती ही कोळीण यांच्या संकरातून वेदव्यास जन्माला आले. त्याचप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य, महादजी शिंदे हे संकरजन्यच होते. हे सांगून अशा संकराचा निषेध कसा करावा, असे ते विचारतात. संकराचा असा गौरव करून, आज सर्व हिंदुसमाज हा एक रक्ताचाच आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. ते म्हणतात, पूर्वी स्मृतींनीच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या अनुलोम विवाहांस संमती दिली होती आणि प्रतिलोम विवाह इतके होत असत की कोणत्या संकरातून कोणती जात निर्माण झाली हे सांगताना स्मृतिकारांची पुरेवाट होत असे. त्यामुळे आजचा हिंदुसमाज एकरक्ताचा आहे या विधानावर कसलाच आक्षेप घेता येणार नाही. ('हिंदुत्व', आणि 'मनुस्मृतीतील महिला' यांत याचे सविस्तर विवेचन आहे.)
 समाजपरिवर्तनाच्या सर्व तत्त्वज्ञानाचा हा सारार्थ आहे.