पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६८०
 


विसंगती
 डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडित यांसारखे सहकारी त्यांना लाभल्यामुळे त्यांच्या कार्याला चांगली गती मिळाली. पण या त्यांच्या कार्याला कृतीची जोड न मिळाल्यामुळे त्याला यावा तसा जोम आला नाही. प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्यांनी स्वतः उपदेशिल्याप्रमाणे विधवाविवाह केला नाही. आणि पंचहौद मिशन प्रकरणी आपल्या विवेकाविरुद्ध जाऊन त्यांनी प्रायश्चित्त घेतले. या व अशा प्रकारच्या विसंगतींमुळे एकंदर समाजसुधारणेच्या कार्याची फार हानी झाली.

धोंडो केशव
 धोंडो केशव कर्वे यांचे या बाबतीतले उदाहरण मोठे लक्षणीय आहे. स्वतःच्य बोलाप्रमाणे कृती करून त्यांनी विधवाविवाह केला आणि स्त्रीशिक्षणसंस्था स्थापून त्या कार्याला सर्वस्वी वाहून घेतले. त्यामुळे आज महाराष्ट्रात स्त्रीशिक्षण म्हणजे कर्वे असे समीकरणच होऊन बसले आहे. तत्त्वज्ञान आणि कृती यांचे सामर्थ्य असे अद्वितीय आहे. त्याच्या अभावी आज अनेक विधवा, मुली घरीदारी, जुन्या काळाप्रमाणे पिचत पडल्या असत्या आणि अनेक कर्तबगार स्त्रियांना व संस्थांना महाराष्ट्र मुकला असता

आगरकर - जातिभेद
 'बुद्धिवादाचे जनक' असा आगरकरांचा मागे उल्लेख केलाच आहे. आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद शिकविणे हेच त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. बुद्धिवादाचे सर्व तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या लेखांतून मांडून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीला प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. जातिभेदामुळे झालेले सर्व अनर्थ त्यांनी पुढील परिच्छेदात अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. ते म्हणतात, 'जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे, ही जेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत; जातीमुळे धर्मविचारांत व आचारांत मतभेद उत्पन्न होऊन तो परस्परवैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे. जातीमुळे देशातल्या देशात किंवा परदेशी प्रवास करणे कठीण झाले आहे. जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग रहावे लागल्यामुळे, फार नुकसान झाले आहे व होत आहे. या जातीमुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकाररती, यांचे क्षेत्र अतिशय मर्यादित झाले आहे. सारांश, ज्या अनेक विपत्ती आपण भोगीत आहो, त्यांपैकी ज्यांचे जनन जातिभेदामुळे झाले नाही अशा फारच थोड्या असतील.'