पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६६०
 


बाळशास्त्री
 बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातल्या सर्वच सुधारणांचे आद्य प्रवर्तक होते. १८३२ साली त्यांनी 'दर्पण' हे पाक्षिक सुरू केले आणि ते बंद पडल्यावर १८४० साली 'दिग्दर्शन' या मासिकातून तेच कार्य पुढे चालविले. राजा राम मोहन राय यांचे ते अनुयायी असून पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. तिच्या प्रसाराने, या देशात फार दिवस व्यापून राहिलेला अज्ञानांधकार नाहीसा होईल, अशी त्यांची खात्री होती. ते आपल्या शिष्यांना शिकवीत की आपले पूर्वकाळचे ऋषिजन विद्यासंपन्न असून, सर्व जन्म विद्यादानात चालवीत. त्यांचेच अनुकरण करून आपण येथील प्रजेत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान रुजविला पाहिजे. बाळशास्त्री केवळ उपदेश करूनच थांबले नाहीत. धर्मांतरितांची शुद्धी करून त्यांना स्वधर्मात परत घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्याप्रमाणे श्रीपाद शेषाद्री या ख्रिश्चनांनी बाटविलेल्या तरुणास शुद्ध करून त्यांनी स्वधर्मात घेतले. यासाठी त्यांना त्या वेळच्या शास्त्रीपंडितांचा कडवा विरोध सहन करावा लागला; पण तो सोसून त्यांनी महाराष्ट्राच्या बुद्धीला नवे वळण लावण्याचे महत्कार्य केले.

मिशनरी
 ख्रिश्रन मिशनऱ्यांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न दीर्घकाळ चालू होते. प्रारंभी कंपनी सरकारने आपल्या हद्दीत त्यांना बंदी घातली होती. कारण त्यामुळे लोकांत प्रक्षोम माजेल व राज्याला धोका निर्माण होईल, अशी त्याला भीती वाटत होती. पण १८१३ साली ब्रिटिश पार्लमेंटने मिशन यांना धर्मप्रसाराचे कार्य करण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांचे कार्य दुप्पट जोमाने सुरू झाले. लोकांना औषधोपचार करणे व शाळा स्थापून त्यांना शिकविणे ही त्यांची धर्मप्रसाराची साधने होती. त्यांचे कार्य विशेषतः दीनदलितांत, हीनजातीयांत चाले. हे कार्य पाहून येथल्या सुशिक्षितांवरही त्याचा फार प्रभाव पडला. कारण रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणविणे, अशी संतांची शिकवण असूनही, प्रत्यक्षात हिंदुधर्मीयांनी ती कधीच अमलात आणली नव्हती. त्यामुळे लोकसेवेचा हा अभिनव प्रकार पाहून, हिंदूधर्म अत्यंत हीन आहे, त्याच्या ठायी असे उदात्त काही नाही, असे त्यांना वाटू लागले व त्यांच्यापैकी काहींनी प्रत्यक्ष धर्मांतरच केले. ते पाहून ख्रिचन मिशनऱ्यांना व मेकॉलेसारख्या पंडितांनाही, पाचपन्नास वर्षात येथे एकही मूर्तिपूजक शिल्लक राहणार नाही, असे वाटू लागले. पण आता हिंदू नेते सावध होऊन आत्मनिरीक्षण करू लागले होते. त्यामुळे त्यांनी हिंदुधर्माचे खरे स्वरूप लोकांना दाखवून तो अनर्थ टाळण्याचे यावत् शक्य प्रयत्न चालविले.