पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१
अस्मितेचा उदय
 

प्राचीन काळी कोळी, भोई, महार व रठ्ठ यांची वस्ती महाराष्ट्रात होती व त्यामुळेच स्थलनामे व भाषानामे निश्चित झाली आहेत. ही उपपत्ती अशीच कल्पनेवर उभारलेली आहे. 'गाव तेथे महारवाडा' ही म्हण मराठीतली व म्हणूनच इ. स. हजार- नंतरची आहे. प्राचीन काळची घटना सिद्ध करण्यास तिचा आधार घेणे सयुक्तिक नाही. दुसरे असे की महार हा शब्द प्राचीन काळी एखाद्या जमातीचे नाव म्हणून रूढ असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राने स्वतःच्या पुत्रांना, त्यांनी अवज्ञा केली म्हणून, शाप दिला व तेच पुढे आंध्र, मूतिब, पुलिंद, पुंड्र, शबर झाले असा उल्लेख आहे. याखेरीज शक, यवन, बर्बर, शबर, म्लेंच्छ, आभीर, हूण, कुशान इ. अनेक आर्येतर व रानटी जमातींचा उल्लेख पुराणात येतो. पण महार हा शब्द आर्य व अनार्य कोणालाच लावलेला नाही. मनूने कैवर्त, चांडाल, किरात, दरद, खश इत्यादी जातींचा उल्लेख केला आहे. पण महार हे नाव कोठेही नाही. मग त्या काळी या नावाची जमात होती व तिच्यावरून या भूमीला नाव मिळाले असे डॉ. केतकर कशावरून म्हणतात ? डॉ. केतकर म्हणतात, त्या काळी येथील लोक आपणास महार म्हणवीत नसतील कशावरून ?' या उपपत्तीची चर्चा करण्याची गरज आहे असे वाटत नाही.
 डॉ. भांडारकरांनी रट्ट या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रिक होय, असे सांगून भोज जसे पुढे आपणास महाभोज म्हणवू लागले तसेच राष्ट्रिक आपणास महाराष्ट्रिक म्हणवू लागले, असे मत मांडले आहे. या भूमीत रस्टिक लोक होते असा निर्देश अशोकाच्या शिलालेखात आहे. त्यावरूनच रट्ट, त्यावरून महारट्ट व त्याचे संस्कृतीकरण महाराष्ट्र, अशी ही उपपत्ती आहे. म. म. पां. वा. काणे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून देशाच्या विस्तारावरून पडलेले असावे. सातवाहन साम्राज्यात महाराष्ट्रातले अनेक घटक विभाग एकत्र झाले व त्या मोठ्या प्रदेशाला महाराष्ट्र असे नाव पडले असे त्यांचे मत आहे.

मिश्रवंश
 महाराष्ट्रातले लोक कोणत्या वंशाचे होते, ते मूळ कोठून आले आणि महाराष्ट्र हे अभिधान कशावरून पडले याविषयीची भिन्न मते आपण पाहिली. त्या मतांत काही विद्वानांची मते अगदीच काल्पनिक आहेत. इतर पंडितांच्या अनुमानांना काही थोडा आधार आहे, पण निश्चित निर्णय देण्याइतका तो पुरेसा नाही. महाराष्ट्री वा अपभ्रंश या भाषा येथे होत्या की नाही हे ठरविण्यास त्या भाषांतील शिलालेख, ग्रंथ, त्या काळच्या पंडितांनी त्यासंबंधी काव्यव्याकरणादी ग्रंथांत केलेले उल्लेख असा प्रत्यक्ष पुरावा मिळतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रीपासून अपभ्रंश व त्या अपभ्रंशापासून मराठी असे सिद्धान्त मांडण्यास स्वरव्यंजनप्रक्रिया, विभक्तिरूपांची घडण अशांसारखी निश्चित वस्तुनिष्ठ प्रमाणे उपलब्ध आहेत. पण येथल्या लोकांचा मूळचा वंश, वर्ण वा जाती कोणती