पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६११
साहित्य आणि कला
 

 साध्या सोप्या भाषेत लिहिल्यामुळे श्रीधराची कविता काव्यगुणात कमी पडली, असे मुळीच नाही. रस, अलंकार, वर्णनशैली, संवादरचना, संक्षेपविस्ताराचे कौशल्य, स्वभावलेखन या सर्व गुणांत श्रीधर कोठेही कमी नाही.
 रामविजय, पांडवप्रताप इ. ग्रंथ श्रीधराने मूळ रामायण महाभारत यांवरूनच लिहिले. पण मध्यंतरीच्या काळात या मूळ ग्रंथांत भर पडत गेली व मूळ कथानकात त्या त्या कवींनी फेरफारही खूप केले. श्रीधराने या सर्वांतून थोडा थोडा भाग घेऊन आपली रचना केली आहे.
 या मोठ्या रचनांशिवाय 'शिवलीलामृत', पांडुरंगमाहात्म्य' 'व्यंकटेश- माहात्म्य', 'ध्रुवचरित्र' अशी स्फुटरचनाही श्रीधराने केली आहे. त्यांतील 'शिवलीलामृत' हा ग्रंथ फार लोकप्रिय आहे. अनेकांच्या तो नित्यपाठात अजूनही आहे.
 आपली सर्व रचना श्रीधराने इ. स. १७०२ ते १७२० या काळात केलेली आहे.
 मध्वमुनी आणि त्याचा शिष्य अमृतराय हे, पहिला आपल्या पदरचेनेसाठी आणि दुसरा कटावरचनेसाठी, प्रसिद्ध आहेत. धनेश्वराची कथा व चोळराजाची कथा या मध्वमुनीच्या रचना आहेत. या दोघांपैकी मोठी ग्रंथरचना कोणी केलेली नाही. पण मध्वमुनीची पदरचना मधुर असल्यामुळे त्या पदांचा प्रसार घरोघरी झाला. आणि अमृतरायाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या कटावांमुळे. हे कटाव प्रास, अनुप्रास, यमके यांचा पाऊस पाडतात. त्यामुळे ऐकणारा मोहून जातो. कीर्तनकारांनी यांचा विशेष उपयोग केला. स्वतः अमृतराय कीर्तनकार होता. त्यामुळे त्या वेळी हे कटाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. दोघेही कवी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले.

मोरोपंत
 आख्यानकवींमध्ये सर्वात विख्यात म्हणजे मोरोपंत. १७२९ ते १७९४ हा याचा काळ. बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या पदरी ते पुराणिक होते. तेथेच त्यांनी आपली सर्व कविता केली. पंतांची एकंदर कविता पाऊण लक्ष आहे. आणि त्यातील निम्म्याच्या वर आर्यावृत्तात आहे. संस्कृत शास्त्र व काव्यनाटके यांचा पंतांनी कसून अभ्यास केला होता. त्यांची ९००० कविता प्रत्यक्ष संस्कृतातच आहे. यामुळे त्यांच्या भाषेत संस्कृतप्रचुरता फार आली आहे. 'कुशलवोपाख्यान', 'हरिश्चंद्राख्यान', प्रल्हाद- विजय', 'देवी माहात्म्य', 'सीतागीत', 'रुक्मिणीगीत' ही यांची स्फुटरचना होय. 'संशयरत्नमाला', 'केकावली' ही यांची स्तोत्रे महाराष्ट्रात फारच प्रसिद्ध आहेत. 'आर्याभारत', 'कृष्णविजय', 'मंत्रभागवत', 'हरिवंश' ही पंतांची मोठी काव्ये होत.
 पंतांना त्यांच्या हयातीतच अमाप प्रसिद्धी मिळाली. रस, वर्णनशैली, अलंकार, स्वभावचित्रे, भाषाप्रभुत्व इ. सर्व गुणांनी मोरोपंतांची कविता सजलेली आहे. त्यांच्या आर्यांचा कीर्तनकारांना फार उपयोग होत असे. आणि त्या काळी, सर्व भारतभर मराठ्यांच्या ठाण्यांतून उत्सव-समारंभात कीर्तने होत असल्यामुळे, पंतांची कविता सर्वत्र पसरली.