पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३१.
मराठेशाहीचा अंत
 



राष्ट्रीय नीतिमत्ता
 सवाई माधवराव १७९५ मध्ये मृत्यू पावला आणि १७९६ च्या डिसेंबरात दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला. तेथपासून १८१८ पर्यंतच्या बावीस वर्षांत त्याने व शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, पटवर्धन, प्रतिनिधी इ. मराठा सरदारांनी मराठेशाहीचा संपूर्ण नाश घडवून आणला. बाजीरावाइतकेच त्याचे सरदारही या विनाशाला जवाबदार आहेत. खर्ड्याला जशी निजामाविरुद्ध त्यांनी एकजूट केली, तशी केवळ लढाईपुरती जरी एकजूट त्यांनी केली असती, तरी इंग्रजांना त्यांचा पराभव करणे अशक्य झाले असते. बाजीरावाने केलेला वसईचा तह त्यांच्यापैकी कोणालाही मान्य नव्हता. तो नाकारून आपण एक होऊन मराठेशाहीचे रक्षण केले पाहिजे, इंग्रजांना हाकून लावले पाहिजे, असे प्रत्येक सरदार म्हणत होता आणि तसा प्रयत्नही करीत होता. पण त्यांना हे जमले नाही, प्रत्येकाने इंग्रजांशी वेगळी लढाई केली आणि प्रत्येक जण पराभूत झाला.
 मागल्या प्रकरणाच्या अखेरीस म्हटल्याप्रमाणे मराठेशाहीचा विनाश अटळच होता. राजवाड्यांनी तेच म्हटले आहे. 'आधीच्या दोन तीन पिढ्या या राष्ट्राची राष्ट्रीय नीतिमत्ता बिघडत जाऊन बाजीरावाच्या वेळी ती पूर्ण नासून गेली होती. त्यामुळे या विनाशाचे आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही,' असे ते म्हणतात; आणि तेच खरे आहे.

वंश माहात्म्य
 बाजीरावाला पेशवाई देऊ नये, असे नाना फडणिसाचे मत होते. तो मराठेशाहीचे
 ३८