Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५७४
 

शाही, धार्मिक, सामाजिक क्रांती हा शिवछत्रपतींचा ध्येयवाद साधण्याइतके बळ निर्माण करणे आणि अखिल भारत संघटित व स्वतंत्र ठेवणे यामुळे त्या संस्कृतीचे खरे आणि कायमचे रक्षण झाले असते. मग इंग्रजी राज्य येथे झाले नसते आणि पाकिस्तान या कल्पनेचा उदयही झाला नसता. पण राष्ट्रभावना नाही, भौतिकविद्या नाही, विश्वसंचार नाही, व्यापाराची नवी दृष्टी नाही, यामुळे दुही, फूट, फितुरी, यादवी, दारिद्र्य, दिवाळ खोरी, या रोगांनी मराठे कायमचे ग्रस्त होऊन राहिले होते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा असा हिशेब आहे.
 नारायणरावाच्या खुनानंतर ते कर्तृत्व आणखीन मलिन झाले आणि सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर ते संपूर्णतया नष्ट झाले. या घडामोडीचीच तात्त्विक, राजकीय मीमांसा पुढील एक दोन प्रकरणांत करावयाची आहे.