पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५५२
 


दुटप्पी धोरण
 वजीर सफ्दरजंग आणि रोहिले यांचे कायमचे वैर होते. कारण अबदालीच्या साह्याने मोगल बादशाही नष्ट करावयाची व बादशहाचे सरदारही धुळीस मिळवावयाचे असा रोहिलेपठाणांचा डाव होता. वजीर आणि रोहिले यांचा पहिला संग्राम १७५० च्या सप्टेंबरात कासगंज येथे होऊन वजिराचा पूर्ण पराभव झाला. याच सुमुमारास शाहू छत्रपतींच्या निधनानंतरच्या भानगडी मिटवून शिंदे, होळकर राजस्थानात आले होते. तेव्हा त्यांना आपल्या मदतीस बोलावून १७५१ च्या एप्रिलात वजिराने पुन्हा पठाणांवर स्वारी केली. या वेळी सिंधीरामपूर येथे लढाई होऊन रोहिल्यांचा अगदी निःपात झाला. यानंतर रोहिल्यांच्यावर सूड उगवण्यासाठी वजिराने पुन्हा स्वारी केली. पण त्या वेळी त्याचाच पराभव झाला. आणि पुन्हा मराठे आपल्यावर चालून येऊ नयेत म्हणून रोहिल्यांनी त्यांशी संधान बांधून, व त्यांस पैशाची निकड आहे हे जाणून, त्यास पन्नास लाख रुपये दिले. तेव्हा त्यांची बाजू मराठ्यांनी संभाळून घेतली. रजपुतांशी वैर निर्माण करणे हे जसे मराठ्यांचे अपकृत्य, तसेच पठाणांना पैशाच्या लोभाने वश होणे हे त्यांचे राजनीतीच्या दृष्टीने दुसरे अपकृत्य होय. बादशहाचे संरक्षण करण्याची जवाबदारी त्यांनी शिरावर घेतली होती. असे असताना रोहिल्यांशी संधान करणे हे केवळ नीतीच्याच नव्हे, तर राजनीतीच्या दृष्टीनेही आक्षेपार्ह होय. येथून पुढे रोहिल्यांना थोडे संभाळून घेणे हा पायंडाच पडला. पानपतावर मराठ्यांना तोच जाचक झाला.

अबदाली
 रोहिल्यांचा पराभव होताच त्यांनी अबदालीला पुन्हा निमंत्रण दिले. त्याप्रमाणे तो काबूलाहून निघून पंजाबपर्यंत आला सुद्धा. त्यामुळे घाबरून जाऊन बादशहाने शिंदे, होळकरांना दिल्लीस बोलाविले. याच वेळी त्याने अबदालीकडेही वकील रवाना केले. आणि त्याची मागणी मंजूर करून त्यास परत पाठविले. यात बादशहाचा आणखी एक हेतू होता. वजिराने अबदालीवर चाल करून पराभव केला तर वजीर फार प्रबळ होईल आणि आपणासही शह देईल अशी भीती वाटल्यामुळेच त्याने परस्पर अबदालीकडे वकील पाठवून त्याची समजूत घातली. अबदालीही तेवढ्यावर संतुष्ट होऊन परत गेला. त्याचे एक कारण हे की शिंदे, होळकर सध्या दिल्लीत आहेत ही वार्ता त्याला पंजाबातच समजली होती. राजकारणाची गुंतागुंत अशी असते.
 याच वेळी मराठ्यांना घेऊन पंजाबात घुसावे व पुढे काबूलवरही चाल करून जाऊन अबदालीचा नक्षा उतरवून तो बादशहाचा सुभा परत मिळवावा असा वजिराचा उद्देश होता. पण बादशहाने परस्पर अबदालीचे प्रकरण मिटवल्यामुळे त्याचा नाइलाज झाला. पण या कारणामुळे मराठ्यांना आता काम काय सांगावयाचे असा