पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४५
साम्राज्याचा विस्तार
 


दुर्लौकिक
 जे जयपुराच्या बाबतीत झाले तेच पुढे १७५४ साली जोधपूरच्या बाबतीत झाले. १७५२ साली विजयसिंग हा जोधपूरच्या गादीवर आला. त्याचा चुलत भाऊ रामसिंग यास ती गादी हवी होती. या वेळी जयाप्पा शिंदे व मल्हारराव उत्तरेत होते. तेव्हा रामसिंग जयाप्पास जाऊन भेटला. पण जोधपूरचे हे साहस आपण अंगावर घेऊ नये, अंतर्वेदीत आपल्याला पुष्कळ काम आहे, अयोध्या, काशी इ. तीर्थक्षेत्रे मुक्त करावयाची आहेत, असे मल्हाररावाने आणि इतर सरदारांनी जयाप्पास परोपरीने सांगून पाहिले. पण तो हट्टास पेटला होता. त्या वेळी सर्वांवर हुकमत चालविणारा मराठ्यांत कोणी नव्हता. सर्वच मुखत्यार. त्यामुळे जयाप्पाने जोधपूरचे काम अंगावर घेतले. त्यात त्याची दोन वर्षे वाया गेली. इतकेच नव्हे, तर विजयसिंगाने दग्याने त्याचा खून केला. शेवटी दत्ताजी शिंदे याने विजयसिंगाचा पराभव करून पन्नास लाख रुपये वसूल केले आणि रामसिंगास निम्मे राज्य मिळवून दिले. पण त्याचे आणखी सहा महिने यात वाया गेले. या वेळी मल्हाररावाची विजयसिंगास फूस होती, असा एक प्रवाद होता. त्यामुळे शिंदे व होळकर यांचे अगदी हाडवैर झाले. दत्ताजीने दुखवट्यासाठी आलेल्या मल्हाररावाची गाठही घेतली नाही. अशा रीतीने रजपूत कायमचे दुखावले गेले, शिंदे-होळकर यांच्यांत कायम बिघाड झाला आणि मराठ्यांचा सर्वत्र दुर्लोकिक झाला.

हिंदू जमाती
 रजपूत, जाट व शीख यांच्या संबंधात मराठ्यांनी उत्तरेत जे राजकारण केले, त्याचा विचार उद्बोधक होईल, असे वाटते. बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मेवाडचा राणा जगत् सिंग याचा मान करून सर्व रजपुतांची मने जिंकून घेतली होती. पण पुढे हे धोरण राहिले नाही. किंबहुना हिंदुपदपातशाही असा घोष उच्चारण्यापलीकडे मराठ्यांनी, त्यांचे कवी, त्यांचे कीर्तनकार, त्यांच्यांतील सत्पुरुष यांनी या ध्येयासाठी काहीही केले नाही. मुस्लिम मुल्ला मौलवींचा असा प्रचार नेहमी चालू असे. नजीबखान रोहिला याचे राजकारण नेहमी असेच चालू असे. अंतर्वेदीत रोहिल्यांची एक वसाहतच झाली होती. हे सर्व अफगाण होते. आणि दिल्लीची मोगल बादशाही नष्ट करून अबदालीला बादशहा करावे, असा त्यांचा मनसुबा होता. मराठ्यांनी चौथाईच्या बदल्यात बादशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. तेव्हा रोहिले व अबदाली यांशी यांचा सामना होणार, हे तेव्हापासूनच ठरले होते. यामुळे शीख, जाट व रजपूत यांशी संघटन करण्याचा मराठ्यांनी कसून प्रयत्न केला असता तर पानपतला त्यांना अपयश आले नसते, किंबहुना पानपतचा प्रसंग उद्भवलाच नसता, असे इतिहासपंडितांचे मत आहे.

 ३५