पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
२८
 

मराठ्यांचे वर्णन केले आहे.

चिनी प्रवासी
 विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे येथे इ. स. ६३४ मध्ये कोरलेला जैन कवी रविकीर्ती याचा लेख आहे. त्यात 'दुसरा चालुक्यसम्राट सत्याश्रय पुलकेशी हा नव्याण्णव हजार गावे असलेल्या तीन महाराष्ट्रकांचा राजा झाला' असा उल्लेख आहे. 'अगमदधिपत्वं यो महाराष्ट्रकाणां, नवनवति सहस्रग्रामभाजां त्रयाणाम् ।' सातव्या शतकात ( इ. स. ६३९ ) हुएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. त्याने महाराष्ट्र, मराठे व मराठ्यांचा राजा सत्याश्रय पुलकेशी यांचे मोठ्या गौरवाने वर्णन केले आहे. तो म्हणतो, 'महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ती धन्यधान्याने समृद्ध आहे. येथले लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. लढाईला निघताना ते मद्य पिऊन धुंद झालेले असतात. आणि अशा भालाइतातील एक शिपाई हजारांना भारी असतो. अशा सैन्यापुढे कोणताच शत्रु उभा राहू शकत नाही. त्यांचा राजा अशा सेनेच्या बळावर शेजारच्या शत्रूला मुळीच मोजीत नाही ( डॉ. रा. गो. भांडारकर. कलेक्टेड वर्क्स, ३ रा खंड, पृ. ७२ ).

प्रकृष्टं प्राकृतम्
 महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः । हे सातव्या शतकात होऊन गेलेल्या कवी- दण्डीचे वचन प्रसिद्धच आहे. त्यावरून महाराष्ट्र हा देशवाचक शब्द होता. त्याची भाषा महाराष्ट्री होती व ती सर्वश्रेष्ठ होती या तिन्ही गोष्टींचा बोध होतो. ' भाग्ये रसविक्रयिणः पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्राः । ' हे वराहमिहिराने ( इ. स. ५०५) बृहत् संहितेत केलेले वर्णन आहे. या ठिकाणी महाराष्ट्राः हा शब्द 'महाराष्ट्र देशे ये जना निवसन्ति ।' महाराष्ट्रात राहणारे लोक, या अर्थी योजलेला आहे, असे बृहत्संहिंतेवरील आपल्या टीकेत भट्टोत्पलाने सांगितले आहे. सागर जिल्ह्यातील एरण या गावी इ. स. ३६५ मध्ये स्तंभावर कोरलेला एक शिलालेख आहे. श्रीधरवर्म्याचा सेनापती सत्यनाग हा आपल्याला महाराष्ट्री म्हणवितो, असे त्यावरून समजते. श्रीधरवर्मा हा महाक्षपत्र होता. सत्यनाग हा त्याचा सेनापती. त्यानेच हा स्तंभ उभारलेला आहे. त्यावरील लेख संस्कृतात असून त्यात 'राज्ञः आरक्षिकेन सेनापति सत्यनागेन महाराष्ट्रप्रमुखेन, महाराष्ट्रेन' असा त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे.
 हा कोरीव लेख आहे आणि 'महाराष्ट्र ' देशाचा उल्लेख असलेला आद्य लेख आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष आहे. हा चौथ्या शतकातला 'महाराष्ट्र' या प्रदेश