पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६५
यशापयश-मीमांसा
 

पुरतीच मर्यादित नसून, कोणत्या जातीने कोणत्या हाताने पाणी प्यावे, गंध कसे लावावे, धोतरे कशी नेसावी, स्त्रियांची वस्त्रे कशी असावी, येथपर्यंत जीवनाच्या सर्व व्यापारांपर्यंत ती आवळलेली असत. कुंभारात दोन जाती आहेत. लग्नामध्ये मिरवणुकीत बायकांनी डोक्यावर पाण्याने भरलेला घडा घेण्याचा अधिकार एका जातीला आहे, दुसरीला नाही. या नियमाचे उल्लंघन होताच मारामाऱ्या होऊन ते खटले पेशव्यांपर्यंत आलेले आहेत. वडाऱ्यांच्या काही जातीत स्त्रिया चोळी वापरीत नाहीत. तशी काही स्त्रियांनी वापरताच त्यांचे खून पडले. ही हकीकत पंचवीस वर्षापूर्वीचीच आहे. कोणत्या जातीने मांतीची भांडी, कोणत्या जातीने तांब्याची वा पितळची भांडी वापरावी हे ठरलेले आहे आणि ती बंधने पोपच्या बंधनांपेक्षा आजही जास्त बळकट आहेत.

व्यक्तित्व नाही
 अशी अविवेकी, अर्थशून्य, कार्यकारणहीन बंधने ज्या समाजात आहेत त्या समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य यांचा उदय होणे शक्य नाही. आणि व्यक्तिस्वातंत्र्य नाही म्हणजे व्यक्तित्व नाही, व्यक्तीला पृथकपणा नाही. व्यक्तीच्या पृथक्-पणातूनच, व्यक्तित्वातूनच सर्व मानवी कर्तृत्वाचा उदय होत असतो. आणि अशा व्यक्ती याच राष्ट्रसंघटना व लोकसत्ता यांचा आधार असतात. कारण या व्यक्तीच नवे संशोधन करू शकतात, नवे तत्त्वज्ञान सांगू शकतात, नवे सिद्धात मांडू शकतात. असे स्वातंत्र्य मिळाल्यावाचून रसायन, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र यांची प्रगती अशक्य आहे. युरोपात दीर्घकाळ ग्रीक वैद्यकच रूढ होते. पण प्रबोधन-युगात बुद्धिस्वातंत्र्य येताच मानवी शरीराचा नव्याने अभ्यास करण्याचे साहस लोक करू लागले. त्यासाठी स्मशानात पुरलेली प्रेते ते गुपचूप आणीत व त्यांची चिरफाड करीत. प्रेताची चिरफाड करणे हे ख्रिस्ती धर्माला मंजूर नव्हते. धर्मपीठे त्या गुन्ह्याला जबर शिक्षा करीत. पण तरीही लोकांनी ते साहस केले आणि आयुर्विद्येची प्रगती केली. पाश्चरला, जंतूमुळे रोग होतात, हे सांगण्याबद्दल शिक्षा होण्याची वेळ आली होती. आणि बायबलविरुद्ध विकासवाद प्रस्थापित करण्याबद्दल डार्विनवर भयंकर गहजब झाला होता. असे असूनही युरोपीय अभ्यासकांनी आपले विद्याप्रेम सोडले नाही. वाटेल त्या यातना, मृत्युदंडही सोसून सत्यसंशोधन चालवायचे असा निर्धार त्यांनी केला म्हणून युरोपला ऐश्वर्य प्राप्त झाले. भारतात हे साहस कोणी केले नाही. त्यामुळे या समाजात माणसाचे मन सदैव बद्ध, जखडलेले आणि त्यामुळे प्रज्ञाहीन असेच राहिले. कलियुग कल्पना, समुद्रगमननिषेध, पतितपरावर्तनाचा निषेध यांनी या समाजाची सर्व प्रगती खुंटली होती. शिवछत्रपतींनी या शृंखलांवर घाव घातला होता. पण यामुळे समाजाचा नाश कसा होतो ते दाखवून सर्व समाजात छत्रपतींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य, ग्रंथ लिहिण्याचे कार्य, कोणी केले नाही. समुद्रगमनाला शास्त्रात त्या वेळी देहान्त
 ३०