पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४४८
 


सिद्दी
 साधारणपणे १६५७ पासून सिद्दीवर चढाई करण्यास महाराजांनी प्रारंभ केला. पहिली मोहीम यशस्वी झाली नाही. पण १६५८ साली रघुनाथ बल्लाळ याने सिद्दीचा पराभव केला आणि त्याच्या अत्याचारांना आळा घातला. अफजलखानाच्या वधानंतर महाराज कोकणात कल्याण-भिवंडी येथे उतरले. तो प्रदेश त्यांनी काबीज केला आणि लगेच आरमाराच्या उभारणीस त्यांनी प्रारंभ केला. सिद्दी हा मराठ्यांचा मोठा वैरी. त्याच्यावर स्वाऱ्या करून १६६० पर्यंत व्यंकोजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांनी दंडा किल्ला काबीज केला आणि जमिनीवरची सिद्दीची सर्व सत्ता नष्ट केली. जंजिरा फक्त त्याच्याकडे राहिला. तो मात्र मराठ्यांना कधीच घेता आला नाही आणि त्यामुळे सिद्दीचा उपद्रव काही प्रमाणात चालूच राहिला. तो छत्रपतींच्या मुलखात शिरून वाटेल ते अत्याचार करी. त्याला मोगल, पोर्तुगीज, इंग्रज यांचा पाठिंबा असे. एकदा त्याने राजापुरी परत घेतली होती. पण मराठ्यांनी ती पुन्हा जिंकली. सिद्दीचा संपूर्ण पाडाव केव्हाच झाला नाही, पण त्याच्यावर वचक बसला हे निश्चित.

पोर्तुगीज
 पोर्तुगीज हे शिवछत्रपतींचे खरे शत्रू. पश्चिम समुद्रावर आपली सार्वभौम सत्ता आहे, असा ते अभिमान बाळगीत आणि वर सांगितल्याप्रमाणे परवान्यावाचून येथे कोणाला फिरकू देत नसत. पण महाराजांनी कोकणातील कल्याण-भिवंडी हे प्रदेश जिंकले, माहुली, तळे घोसाळे, चौल हे किल्ले घेतले आणि आरमारही बांधले; तेव्हा परिस्थिती ओळखून त्यांनी होऊन छत्रपतींच्याकडे वकील पाठविला आणि तह केला. त्यांनी पोर्तुगीज मुलखात उपद्रव देऊ नये आणि पोर्तुगीजांनी छत्रपतींना तोफा, दारूगोळा वगैरे सामान पुरवावे, अशा तहाच्या अटी होत्या. आरमाराच्या केवळ स्थापनेमुळे हा पहिला विजय मिळाला. पुढे लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू हे कोकणचे देसाई पोर्तुगीज प्रदेशात राहून महाराजांच्या मुलखात उपद्रव करीत. तेव्हा १६६७ साली त्यांनी बारदेशावर स्वारी करून पोर्तुगिजांची खोड मोडली आणि पुन्हा एकदा हवा तसा तह करून घेतला. १६७२ साली रामनगरचे राज्य मोरोपंत पिंगळे याने खालसा केले. त्या कोळी राजाला पोर्तुगीज चौथाई देत असत. आता छत्रपतींनी तीच मागणी त्यांच्याकडे केली. पोर्तुगिजांनी खळखळ फार केली पण शेवटी १६७९ साली त्यांना ती मागणी मान्य करावी लागली. परवानापद्धती त्यांना आधीच रद्द करावी लागली होती.

इंग्रज
 मुंबई बंदर इंग्रजांच्या ताब्यात गेले. तेव्हा त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी, छत्र-